आशिष दुबे
नागपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल हा शहरात शिक्षण घेण्याकडे असतो. परंतु अकरावीच्या प्रवेशासंदर्भात उलटेच होताना दिसते आहे. शहरातील विद्यार्थी प्रवेशासाठी ग्रामीण भागाकडे वळत आहे. त्यामुळे ग्रामीणच्या स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातील कॉलेजच्या जागा भरल्याने विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घ्यावा लागत आहे.
शहरालगत असलेल्या कामठी, हिंगणा, नागपूर ग्रामीण, कळमेश्वर, कुही या भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जागा फुल झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील काही महाविद्यालयांनी अकरावीच्या अतिरिक्त जागा वाढवून देण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव आले आहे. परंतु त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.
- लवकर होईल निर्णय
यासंदर्भात सहायक शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी सांगितले की, कुठल्याही महाविद्यालयाला अतिरिक्त जागा वाढवून देण्यापूर्वी कॉलेजमध्ये प्रवेशाची स्थिती काय आहे, याची माहिती घेतली जाते. जर तेथील सर्वच जागा भरल्या असतील तरच अतिरिक्त जागा वाढवून दिल्या जातात. आतापर्यंत जेवढे प्रस्ताव आलेले आहे. त्यावर एका आठवड्यात निर्णय घेण्यात येईल.
- शहरातील मनपाच्या क्षेत्रात रिकाम्या जागांवर अजूनही अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या फेरी अखेर शहरातील ५८,८७५ जागेपैकी २१,४२१ जागेवरच प्रवेश झाले आहे. अजूनही अकरावीच्या ३७,४५४ जागा रिक्त आहे. त्यामुळे केंद्रीय प्रवेश समितीने विशेष फेरीचे आयोजन केले आहे.