लाेकमत न्यूज नेटवर्क
मौदा : तालुक्यातील गट ग्रामपंचायत दुधाळा (बारशी) अंतर्गतच्या झुडपी जंगलाच्या शासकीय जागेवर गेल्या ४० वर्षांपासून अतिक्रमण करून ४१ कुटुंब वास्तव्य करीत आहेत. परंतु हे कुटुंब अतिक्रमित जागेवर राहात असल्याने त्यांना शासकीय याेजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण नियमित करा, या मागणीसाठी ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. यासंदर्भात दुधाळा (बारशी)चे सरपंच उमेश झलके यांनी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे निवेदन नुकतेच साेपविले.
४१ कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या या जागेवरील अतिक्रमण नियमित केल्यास त्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळणार आहे. शिवाय, या कुटुंबांना शासकीय याेजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. यासाठी सरपंच उमेश झलके व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत हे अतिक्रमण नियमित करण्याबाबतचा ग्रामपंचायतीमध्ये सर्वानुमते ठराव पारित केला. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे निवेदन साेपवीत हे प्रकरण निकाली काढण्याची मागणी सरपंच उमेश झलके, उपसरपंच सुखदेव राेशनखेडे, अजय झलके, याेगेश वहाणे, अजय हिवसे यांनी केली आहे.