नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी संपादित मौजा तेल्हारा येथील जमिनीचा मोबदला वाढविण्यास नकार देऊन शेतकऱ्याचे अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला.
सुभाष मस्के असे शेतकऱ्याचे नाव असून, मिहान प्रकल्पाकरिता त्यांची मौजा तेल्हारा येथील ३ हेक्टर ९० आर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात ८ जून २००७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भूसंपादन अधिकाऱ्याने २८ जून २०१० रोजी त्यांना सहा लाख रुपये प्रति हेक्टर मोबदला मंजूर केला होता. मस्के यांनी त्यावर समाधान न झाल्यामुळे मोबदला वाढवून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. ७ डिसेंबर २०१५ रोजी दिवाणी न्यायालयाने त्यांना १८ लाख रुपये प्रति हेक्टर मोबदला मंजूर केला. जमीन महानगरपालिका सीमेलगत व महामार्गाजवळ असल्यामुळे त्यांना मोबदला वाढवून देण्यात आला. परंतु, मस्के यांचे त्यावरही समाधान झाले नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रति हेक्टर एक कोटी रुपये मोबदला मिळण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मौजा खापरी रेल्वे, मौजा खडका, मौजा जामठा व मौजा चिचभवन येथील जमिनीची विक्रीपत्रे सादर केली होती. उच्च न्यायालयाने ही चारही गावे तेल्हारापासून लांब असल्यामुळे संबंधित विक्रीपत्रे मस्के यांच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यास लागू होत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, याशिवाय अन्य ठोस पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे सांगून दिवाणी न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.