नागपूर : दहा दिवसापूर्वी कळमना ठोक बाजारात २५ रुपये किलोपर्यंत कमी झालेले लाल कांद्याचे भाव आता दर्जानुसार ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. याउलट पांढऱ्या कांंदे २० ते २२ रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत. नाशिकमध्ये लाल कांद्याचे पीक निघण्यास उशीर झाल्याने राज्यात सर्वत्र भाव वाढले आहेत. त्यामुळे लोक पांढऱ्या कांद्याची जास्त खरेदी करीत आहेत. त्यातच कळमन्यात बटाटे दर्जानुसार ७ ते १२ रुपये किलो आहेत.
ठोक बाजारातील भावानुसार किरकोळमध्ये लाल कांदे ५० रुपये किलो तर पांढरे कांदे ३५ ते ४० रुपये किलो विक्रीस आहेत. याशिवाय ठोकमध्ये बटाटे ७ ते १२ रुपये किलो असतानाही किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना महागाईचा अनुभव येत आहे.
लाल कांद्याचे दर लवकरच कमी होणार
कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, दहा दिवसापूर्वी आटोक्यात असलेले लाल कांद्याचे भाव आवकीअभावी वाढले आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात पुढील दोन आठवड्यात पीक निघाल्यानंतर भाव कमी होतील. पण आता भाव जास्त आहेत. कळमन्यात नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून माल येत आहे. दररोज ९ ते १० ट्रकची (एक ट्रक दहा टन) आवक आहे. याशिवाय पांढऱ्या कांद्याची आवक गुजरात राज्याच्या महुआ आणि भावनगर येथून आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक २५ टन) कळमन्यात येत आहेत. महाराष्ट्र वगळता पांढरे कांदे देशात अन्य राज्यात फार कमी विकले जातात. पण आता लाल कांदे महाग झाल्याने सर्वच राज्यात पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली आहे. यंदा गुजरात राज्यात पांढऱ्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले असून, येथून सर्वच राज्यात विक्रीसाठी जात असल्याचे वसानी यांनी सांगितले.
यंदा बटाट्याचे बम्पर पीक
गेल्यावर्षी पावसामुळे बटाटे पिकाला फटका बसल्यानंतर जानेवारीत भाव ठोकमध्ये ४० रुपये तर किरकोळमध्ये ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे उत्तर प्रदेशात बम्पर पीक आले आहे. कळमन्यात दररोज प्रयागराज, कानपूर आणि आग्रा येथून २० ट्रकची आवक आहे. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो भाव आहेत. नवीन बटाटे लवकर शिजत नसल्याच्या गृहिणींच्या तक्रारी आहेत.
लसणाचे भाव उतरले
कळमना ठोक बाजारात दहा दिवसापूर्वी दर्जानुसार १०० ते १२५ रुपयांवर गेलेले लसणाचे भाव आता आवक वाढल्याने ७५ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळमध्ये २०० रुपयांवर पोहोचलेल्या लसणाचे भाव किरकोळमध्ये १२५ ते १४० रुपये किलो आहेत. यावर्षी लसणाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्याचा परिणाम म्हणून सध्या बाजारात आवक वाढली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पीक निघाले आहे. जावरा, मनसोर, छिंदवाडा येथून दररोज चार ते पाच ट्रकची (एक ट्रक दहा टन) आवक आहे. लसणासोबतच अद्रकाचे भाव कमी झाले असून, किरकोळमध्ये ४० रुपये किलो भाव आहे. कळमन्यात दररोज छिंदवाडा, औरंगाबाद आणि केरळ येथून तीन ते चार ट्रक येत आहेत.