लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : कुही तालुक्यात धानाचे पीक हळूहळू कमी हाेत असले तरी काही शेतकरी अजूनही धानाचे पीक घेतात. गुरुवारी (दि. ८) काेसळलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीला सुरुवात केली आहे. राेवणीसाठी वेळेवर पुरेसे मजूर मिळत नसल्याने शेतकरी मजुरांची मनधरणी करीत असल्याचेही दिसून येत आहे.
पूर्वी कुही तालुक्यात धानाचे माेठ्या प्रमाणात पीक घेतले जायचे. परंतु, पावसाची अनियमितता आणि सिंचनाच्या प्रभावी सुविधांचा अभाव तसेच वाढता उत्पादनखर्च आणि बाजारात धानाला बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून साेयाबीन, कपाशी व तुरीची पिके घ्यायला सुरुवात केली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताचे साधन आहे, तेच शेतकरी धानाचे पीक घेण्याचे धाडस करीत आहेत.
सध्या कुही तालुक्यातील कुही, मांढळ, वग, वीरखंडी, पारडी, वडेगाव, माजरी, वेलतूर, साळवा, पचखेडी, तारणा या भागात आजही काही शेतकरी धानाचे पीक घेतात. त्यांनी मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात हाेताच पऱ्हे टाकले हाेते. ते राेवणीयाेग्य हाेऊनही समाधानकारक पाऊस न बरसल्याने राेवणी रखडली हाेती.
विशेष म्हणजे, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांकडे ओलिताचे साधन असल्याने ते धानाचे पीक घेतात. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यानंतरही त्यांनी ओलित करून पऱ्हे जगवले. त्यातच गुरुवारी संपूर्ण तालुक्यात दमदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने चिखलणी करून मांढळ, वग, वीरखंडी व पारडी शिवारात राेवणीला सुरुवात केली आहे. राेवणीला वेळेवर पुरेसे मजूर मिळत नसल्याने अडचणी येत असल्याचेही काही धान उत्पादकांनी सांगितले.