लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२० या ‘कोरोना’च्या वर्षात दर महिन्याला सरासरी जवळपास साडेतीन हजार रेल्वेगाड्या रद्द झाल्या. परंतु वर्षभरात मध्ये रेल्वेच्या नागपूर मंडळात ७७ लाखाहून अधिक नागरिकांनी रेल्वे प्रवास केला. तिकिटातूनच नागपूर मंडळाला १६९ कोटीचा महसूल प्राप्त झाला. तर मालगाड्यांच्या वाहतुकीतून अडीच हजार कोटीहून अधिकचा महसूल मिळाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडे विचारणा केली होती. २०२० साली मध्य रेल्वेच्या किती रेल्वेगाड्या रद्द झाल्या, किती प्रवाशांनी प्रवास केला, त्यातून किती महसूल प्राप्त झाला, मालवाहतुकीतून किती महसूल मिळाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ७७ लाख ८८ हजार नागरिकांनी रेल्वे प्रवास केला. त्यातून मंडळाला १६९ कोटी ७९ लाखाचा महसूल प्राप्त झाला. तर याच काळात मालगाड्यांच्या माध्यमातून २ हजार ५८० कोटी ३१ लाखाचा महसूल मिळाला.
विना तिकीट प्रवाशांना पावणेदोन कोटीचा दंड
विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडापोटी नागपूर मंडळाला १ कोटी ७८ लाख रुपयाचा महसूल प्राप्त झाला. भिक्षेकऱ्यांविरोधात २३ प्रकरणे दाखल झाली व त्यांना न्यायालयाकडून २१ हजार ६०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. तृतीयपंथीयांविरोधात ८६ गुन्हे नोंदविण्यात आले व त्यांना ८८ हजार ६०० रुपयाचा दंड झाला. तर न्यायालयाने बेकायदेशीररीत्या पार्किग करणाऱ्या १५७ जणांकडून ४८ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल करण्याचे निर्देश दिले.
अशी होती रद्द आणि धावलेल्या रेल्वेगाड्यांची संख्या
महिना - धावल्या -रद्द
जानेवारी-४,२४०- ८८
फेब्रुवारी-३,८८६- १३७
मार्च-२,९५५-१,४८९
एप्रिल-०-४,३९०
मे - ६२ -४,५३३
जून- ४५२ -४,३९७
जुलै- ४३६ -४,४९५
ऑगस्ट - ३८६ -४,५०१
सप्टेंबर- ५३४ -४,३४५
ऑक्टोबर - ९७१ -४,४९६
नोव्हेंबर-१,५०३-४,३२४
डिसेंबर-१,५७१-४,४५७