नागपूर : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरगत शेती करताना शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया करावी. कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील ६५ प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे याप्रसंगी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शैक्षणिक अनुभव नसला तरी शेतकरी त्यांच्या कष्टातून अनुभव घेत शिकतात. त्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषीविषयक विशेष उपक्रम राबविताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन शुभांगी कामडी-भस्मे यांनी तर आभार वंदना भेले यांनी मानले.