लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३० सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यासाठी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. २०११ मधील शहरातील एकूण लोकसंख्येचा विचार करून १५१ वॉर्डाची रचना केली जात आहे. शहराच्या उत्तरेकडून सुरुवात करण्यात आली आहे. याचा शेवट दक्षिणेकडे होईल.
वॉर्ड रचना करताना शहरातील जुन्या भागातील वॉर्डाचे क्षेत्र कमी राहील; परंतु शहरालगतच्या भागात वॉर्डाचे क्षेत्र मोठे राहणार आहे. २०११ च्या लोकसंख्येवर वॉर्ड रचना होत आहे; मात्र मागील १० वर्षात शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात प्रामुख्याने शहरालगतच्या भागाचा समावेश आहे. याचा विचार करता या भागातील वॉर्डात लोकसंख्या कमी व मतदार अधिक असे चित्र राहणार आहे.
...
दोन सदस्यीय झाल्यास पुन्हा वॉर्ड रचना
निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा आराखडा तयार केला जात आहे; परंतु राज्य सरकारने दोन सदस्यीय वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला तर वॉर्ड रचना पुन्हा करावी लागेल, अशी माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच यासाठी पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
....
४० हजार मतदारांची नावे वगळली
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो नसलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. शहरातील जवळपास ४० हजार मतदारांचा यात समावेश आहे. याचा विचार करता मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची शहानिशा करावी. नाव नसल्यास निवडणूक कार्यालयाकडे अर्ज करून आपल्या नावाचा समावेश करणे गरजेचे आहे. मनपाच्या झोन कार्यालयांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत.