रेल्वेला होतोय विलंब : बस व्यवस्थापनाला लाभनागपूर : मागील आठवड्यात इटारसीजवळ आरआरआय केबिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने उपराजधानीतील खासगी बस व्यवस्थापनाने अचानक १० ते १५ टक्क््याची वाढ त्यांच्या बसभाड्यात केली आहे. पावसामुळे बहुतांश रेल्वेगाड्या रद्द होत आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. अनेक प्रवासी रेल्वेचे तिकीट रद्दही करीत आहेत. त्यामुळे अपरिहार्यतेने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा सहारा घ्यावा लागतो आहे. रेल्वे वाहतूक पावसाने प्रभावित होत असल्याने प्रवाशांच्या गरजेचा खासगी बसचालक लाभ घेत आहेत. खासगी बसेसमध्ये एसी बसेसचे बुकिंग अधिक करण्यात येत आहे. शहरातील गीतांजली चौक, बोले पेट्रोल पंप, बैद्यनाथ चौक, जाधव चौक, वर्धमाननगर, मानेवाडा आदी ठिकाणांहून खासगी बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी प्रयत्न करीत आहेत. साधारणत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बसभाड्यात घट होते. बसने पावसात जाण्याचे प्रवासी टाळतात. पण इटारसीच्या आरआरआय केबिनमध्ये लागलेली आग आणि मुंबईला झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. बसेसच्या वाढलेल्या भाड्याबाबत विचारणा केली असता महाराष्ट्र बस, ट्रक, टेंपो वाहतूक महासंघाचे महासचिव महेंद्र लुले म्हणाले, खासगी बसचे भाडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कमी आहे. खासगी बसेसला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो. एस. टी. ला टोल माफ करण्यात आला आहे. आम्हीदेखील समान सेवाच देतो पण आम्हाला या सुविधा मिळत नाहीत. अनेक मार्गावर एसटीच्या सामान्य बसच्या भाड्याच्या तुलनेत खासगी एसी बसेसचे भाडे कमी आहे. तरीही खासगी बसेसवर नेहमीच टीका केली जाते. काही विशेष प्रसंगात १० ते १५ टक्के वाढ होते. (प्रतिनिधी)
खासगी बसभाडे वाढले
By admin | Updated: June 26, 2015 02:43 IST