लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : जुन्या वादातून भांडणाला सुरुवात झाली आणि पाच जणांनी एकावर प्राणघातक हल्ला चढविला. त्यांनी त्याला लाेखंडी राॅडने जबर मारहाण केल्याने ताे गंभीर जखमी झाला. या पाचही आराेपींना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार मंगेश काळे यांनी दिली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दातेवाडी येथे शनिवारी (दि. १३) सायंकाळी घडली.
पुरुषोत्तम सखाराम तायडे (४२) असे गंभीर जखमीचे तर श्रावण ढोणे (२७), नीलेश ढोणे (२५), जनार्दन ढोणे (४०), मनोज ढोणे (३०) व धीरज इंगळे (३०), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. जखमी व सर्व आराेपी दातेवाडी, ता. नरखेड येथील रहिवासी आहेत. तायडे व ढाेणे यांच्यात जुना वाद आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्यातील हा वाद उफाळून आला आणि भांडणाला सुरुवात झाली.
त्यातच या पाचही जणांनी पुरुषाेत्तम तायडे यांच्यावर हल्ला चढविला. त्या सर्वांनी लाेखंडी राॅडने जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी पुरुषाेत्तम यांना जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे त्यांच्या बयाणावरून पाेलिसांनी भादंवि ३०६, ३०७, १४३,१४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नाेंदवून पाचही आराेपींना अटक केली. शिवाय, प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास राजेश कोल्हे, मोरेश्वर चलपे, संजय इंगोले आदी पाेलीस कर्मचारी करीत आहेत.