शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

ओबीसींचा राजकीय फुटबॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

एखाद्या समाजघटकांच्या जिव्हाळ्याच्या, जगण्या-मरण्याच्या प्रश्नाचा कसा राजकीय फुटबॉल होतो, हे समजून घ्यायचे असेल तर सध्या इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसींच्या ...

एखाद्या समाजघटकांच्या जिव्हाळ्याच्या, जगण्या-मरण्याच्या प्रश्नाचा कसा राजकीय फुटबॉल होतो, हे समजून घ्यायचे असेल तर सध्या इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळाकडे पाहायला हवे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची तरतूद करणारे कलम रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. ते आरक्षण अडचणीत आले आहे, हे मात्र खरे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती व जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा नाही. २०१० मधील के. कृष्णमूर्ती खटल्याच्या आधारे न्यायालयाचे म्हणणे असे की, हे जाती व जमातीला दिलेले आरक्षण घटनात्मक, तर ओबीसींचे आरक्षण वैधानिक म्हणजे राज्य सरकारांनी निर्धारित केलेले आहे. जिथे अनुसूचित जाती व जमाती मिळून आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असेल तिथे ५० टक्क्यांपर्यंत उरलेले आरक्षण ओबीसींना देता येईल. एखादा जिल्हा किंवा तालुका पूर्णपणे आदिवासी अथवा अनुसूचित जातीबहुल असेल तर तिथे जितकी लोकसंख्या तितके म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण दिले जाऊ शकते. तथापि, जिथे असे नाही तिथे या तिन्ही घटकांच्या एकूण आरक्षणाला मात्र कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांचा उंबरठा ओलांडता येणार नाही. दुसरी बाब, ओबीसींना १९९४ पासून मिळणाऱ्या आरक्षणाला आकडेवारीचा आधार हवा. न्यायालयाच्या भाषेत स्वतंत्र मागासवर्ग आयोग नेमून इम्पिरिकल डाटा म्हणजे नमुना सर्वेक्षणाच्या स्वरूपातील ती आकडेवारी सादर करा व खुश्शाल आरक्षणाचा हक्क मिळवा. पण, ओबीसींचे आरक्षण रद्दच झाले अशी आवई उठवून महाराष्ट्रातील झाडून सगळ्या पक्षांना अचानक ओबीसींच्या राजकीय भवितव्याचा पुळका दाटून आला आहे. काहींची आंदोलने, काहींचे चिंतन मेळावे सुरू आहेत. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने राज्यभर चक्का जाम केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारलाच आरक्षणासाठी दोषी धरताना, तुम्हाला जमत नसेल तर आरक्षण परत मिळवून देण्याच्या मोहिमेची सूत्रे आमच्याकडे द्या. चार महिन्यांत आरक्षण मिळवून दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन’, अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणा करून टाकली. म्हणजे कोण सत्तेवर आहे यावर आरक्षण ठरणार आहे जणू. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधील नेत्यांनी ही सगळी चूक आधीच्याच, म्हणजे फडणवीस सरकारची चूक असल्याच्या मुद्द्यावर लोणावळ्यात राजकीय चिंतन केले. या सगळ्याचा अर्थ जी चिंता व्यक्त होतेय, चिंतन सुरू आहे, ते अगदीच निरर्थक नाही. सत्ताधारी आघाडी व विरोधी भाजप या दोन्हींचे दावे-प्रतिदावे खरे आहेत; पण अर्धेच. भाजप-सेना युती सरकारच्याच काळात नागपूर, अकोला, वाशिम वगैरे जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर झाल्या. तेव्हा, ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आकडेवारीचा मुद्दा समोर आला. तेव्हा मागासवर्ग आयोग स्थापन करून आम्ही तातडीने इम्पिरिकल डाटा सादर करतो, या अटीवर निवडणूक घेण्यास परवानगी मागच्या सरकारनेच मागितली. तशी ती न्यायालयाने दिली. ती आकडेवारी मात्र सादर करण्यात आली नाही. तेव्हा संतापून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये ओबीसी गट व गणांमधून निवडून आलेल्यांचे सदस्यत्व रद्द केले व त्या जागा पोटनिवडणुकीत खुल्या, सर्वसाधारण वर्गातूनच भरायला सांगितले. खरे तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही सगळी वस्तुस्थिती ओबीसी समाजाला समजून सांगायला हवी. दुसरीकडे स्वतंत्र मागासवर्ग आयोग नेमून आकडेवारी जमा करून ती सर्वोच्च न्यायालयाला सादर करायला हवी किंवा मध्यंतरी जी जातीगणना झाली ती आकडेवारी मिळवायला हवी. आरक्षण देण्यामागील राज्याचा हेतू प्रामाणिक असल्याचे व त्याला तालुका, जिल्हा स्तरावरील आकडेवारीचा आधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरक्षण बहाल केले जाईल. ओबीसी महासंघाच्या काही जाणकारांचेही असेच म्हणणे आहे. सोबतच घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण द्यावे, अशीही मागणी आहे. त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याऐवजी मराठा समाजापाठोपाठ ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आघाडीला घेरण्याची संधी विरोधकांनी साधणे आणि आधीचे सरकार बहुजनविरोधी होते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करणे यातून राजकीय गदारोळ नक्कीच निर्माण होईल. ओबीसींचे राजकीय भले मात्र सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या मार्गानेच होऊ शकेल.

--------------------------------------------