मंडळासमोर उपस्थित राहावे : घनकचरा व्यवस्थापनात अपयशनागपूर : शहराला ‘बीन फ्री’ शहर करण्याचा दावा मनपाने केला आहे. पण हा दावा संपूर्णपणे पोकळ सिद्ध होत आहे. घनकचरा व्यवस्थापन कायद्यावर अमल करता येत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपावर कारवाईचा बडगा उभारला आहे. मंडळाने शनिवारला सूचना पाठवून सदस्य सचिवांच्या समक्ष महापौर आणि आयुक्तांना हजर होण्याचे निर्देश दिले आहे. या नोटीसमध्ये मंडळाने १२ सप्टेंबरपर्यंत मनपाकडून लिखित उत्तर मागितले आहे. याशिवाय मंडळाचे सदस्य सचिव राजीव कुमार मित्तल यांच्यासमोर १५ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे निर्देशही दिलेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी मनपाला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी चार महिन्यांची रूपरेषा तयार करून त्यावर अमल करण्याचे निर्देश दिले होते. भांडेवाडी येथील कत्तलखान्यासाठी दूषित पाणी प्रक्रिया केंद्र (इटीपी) स्थापित करण्याचे निर्देशही मनपाला देण्यात आले होते. फेब्रुवारीत संबधित निर्देश पाठविण्यात आले. मागील महिन्यात मंडळातर्फे दौरा आयोजित करून मनपाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. पण मनपाने मंडळातर्फे दिलेल्या निर्देशांवर कारवाई केली नव्हती. त्यामुळेच मंडळाने महापौर, आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवस्थापनात अयशस्वी ठरलेल्या मनापावर मंडळ नाराज आहे.(प्रतिनिधी)
महापौर, आयुक्तांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस
By admin | Updated: September 7, 2014 00:49 IST