लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत सप्टेंबर महिन्यात वरुणराजाने कृपा केल्याचे चित्र असून धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व कामठी खैरी या धरणांच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. तोतलाडोहचा पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवणार नाही.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तोतलाडोह व कामठी खैरीतील जलसाठा ७२.०२ व ५९.५७ टक्क्यांवर पोहोचला होता. चारच दिवसात यात वाढ झाली व सोमवारी ही टक्कवारी अनुक्रमे ८०.११ व ६६.५६ टक्के इतकी झाली. तोतलाडोहच्या पाणीसाठ्यात चारच दिवसांमध्ये आठ टक्क्यांची भर पडली. तोतलाडोहची क्षमता १,०१६.८८ दलघमि इतकी असून आतापर्यंत ८१४.६७ पाणीसाठा जमला आहे. मागील वर्षी यात तारखेला तोतलाडोहमध्ये ९४.६६ टक्के पाणीसाठा होता.
पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता
मध्यप्रदेशात पेंच नदीवर बनविण्यात आलेल्या चौराई धरणाचा पाणीसाठा ८२.१८ टक्के इतका झाला आहे. तेथे आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तोतलाडोहमधील पाणीसाठ्यात देखील वाढ होईल.
नागपूर जिल्ह्यातील जलसाठा
मोठे प्रकल्प : टक्केवारी
तोतलाडोह : ८०.११
कामठी खैरी : ६६.५६
खिंडसी : ४९.६०
लोअर नांद : ७२.००
वडगाव : ९०.३२