नागनदी शुद्धीकरणासाठी तयार झालेल्या प्रस्तावानुसार शुद्धीकरणाचे काम जपानच्या एका कंपनीला देण्यात येणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी अशाच एका जपानी कंपनीला नागनदी शुद्धीकरणाचे काम देण्याचा प्रस्ताव आला होता, जो आम्ही फेटाळला होता. आता पुन्हा तशाच कंपनीला कंत्राट देण्याची चर्चा आहे. जपानमध्ये ज्यांना नाकारले, त्या कंपन्या भारतात कशा चालतात, हे गौडबंगालच आहे, अशी टीका प्रद्युम्न यांनी केली.
केंद्रीकृत सिवेज ट्रीटमेंटमध्ये अनेक अडथळे
प्रस्तावानुसार सांडपाण्यावर नियंत्रणासाठी शहराबाहेर केंद्रीकृत (सेंट्रलाईज) सिवेज ट्रीटमेंटची योजना आखली जात आहे. प्रद्युम्न यांच्या मते हा प्लॅन यशस्वी होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे सांडपाण्यावर नियंत्रण येणार नाही. ते नदीत वाहतच जाणार आहे. नदीपात्रात शुद्धीकरण करून काही उपयोग होणार नाही. दुसरीकडे शहराबाहेर ट्रीटमेंट उभारण्याचे बोलले जाते. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शहर वाढत असल्याने कधी ना कधी प्लँटपर्यंत पोहचतीलच. त्यामुळे आहे त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढेल, हे निश्चित.