नागपूर : कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे खरे असले तरी कंपनीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही थकबाकी जमा करणेही तेवढेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले. वीज बिल नियमित भरण्यासाठी शिस्त यावी या दृष्टीने जागृती करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या.
नागपूर परिमंडळाच्या कार्याच्या आढावा बैठकीत खंडाईत बोलत होते. ते म्हणाले, कंपनीची ढासळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता थकबाकी वसूल करणे गरजेचे आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ८५ टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. ही रक्कम नियमित द्यावी लागते. आता तर कर्ज घेण्याची मर्यादाही संपली आहे. अशा परिस्थितीत वसुली हाच एकमेव उपाय आहे.
कंपनी वाचविण्यासाठी हे गरजेचे असल्याने या कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, अमित परांजपे, संजय वाकडे आदी उपस्थित होते.