राष्ट्रवादी आक्रमक : पवार, तटकरे, पाटील यांना साकडे नागपूर : विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरात किमान तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला याव्यात, यासाठी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत शहरात राष्ट्रवादीसाठी तीन जागा मागा अन्यथा काँग्रेससोबतची आघाडी तोडा, अशी आग्रही मागणी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे तिन्ही नेते गडचिरोलीतील कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळावर आले. या वेळी अजय पाटील यांच्यासह सरचिटणीस राजेश कुंभलकर, योगेश मसराम, प्रशांत बनकर, पराग नागपुरे आदींनी त्यांची भेट घेतली व पक्षाला उमेदवारी मिळणे कसे आवश्यक आहे, ते पटवून दिले. काँग्रेसची आघाडी होत नसेल तर राष्ट्रवादी सहाही जागांवर लढण्यास तयार आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. पश्चिम नागपुरात काँग्रेस गेल्या २० वर्षांपासून पराभूत होत आहे. पूर्व व मध्य नागपुरातही मोठ्या फरकाने काँग्रेस हरली आहे. लोकसभेतही या मतदारसंघात काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची आघाडी करताना पश्चिम, पूर्व व मध्य नागपूर या तीन जागा पक्षाला मिळाव्यात, अशी बाजू मांडण्यात आली. राष्ट्रवादीला शहरात एकही जागा मिळणार नसेल तर आघाडी करण्यात अर्थ नाही. महापालिका निवडणुकीत २००७ मध्ये जागावाटपात राष्ट्रवादीला १३६ पैकी २२ मिळाल्या. यापैकी पश्चिममध्ये राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक विजयी झाले. तीन दुसऱ्या क्रमाकांवर होते, तर काँग्रेसचे पाच नगरसेवक विजयी झाले. २०१२ मध्ये २९ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. त्यातील दोन पश्चिममध्ये विजयी झाले. तीन जागा थोड्या फरकाने हरल्या. आता विधानसभेत एकही जागा मिळाली नाही तर काँग्रेसची हुकूमशाही वाढेल व पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ३० ते ४० जागाच दिल्या जातील. हा कार्यकर्त्यांवर अन्याय ठरेल. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपातच कणखर भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली. पवार, तटकरे व पाटील या तिन्ही नेत्यांनी स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व जागावाटपात याचा विचार केला जाईल, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)
तीन जागा मागा, अन्यथा आघाडी तोडा!
By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST