मौदा : धानला परिसरातून पेंच कालवा गेला आहे. गतवर्षी रेवराल-खरबी पेंच कालव्यातील लहान मायनरच्या फुटलेल्या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. यासोबतच बंधाऱ्याची उंची कमी असून, याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करून उंची वाढवावी, अशी मागणी येथील शेतकरी गुंडेराव पत्रे यांनी केली आहे. गतवर्षी या कालव्यातील एक बंधारा फुटला होता. कालव्यात सोडलेले पाणी हे थेट बंधाऱ्यात न थांबता सरळ निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यानंतरही याची दुरुस्ती करण्यात आली. बंधाऱ्याचे बांधकाम कमी उंचीचे झाल्याने पेंच धरणातील पाणी कालव्यात सोडण्यात आल्याने ते बंधाऱ्यात न थांबता सरळ निघून जाते. याचा सिंचनाला फटका बसतो.