अंबाझरी घाटावर इको फ्रेंडली अंत्यसंस्कार : पर्यावरणवादी संघटनांनी घेतला पुढाकारनागपूर : एका अंत्यसंस्कारासाठी दोन झाडांची कत्तल करण्यात येते. शहराच्या पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन लक्षात घेता, झाडांची कत्तल थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराला लाकडाचा पर्याय म्हणून गोवऱ्यांचा उपयोग करण्याचे आवाहन मनपाने केले आहे. यासाठी एका पर्यावरणवादी संस्थेने पुढाकार घेतला असून, या उपक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. घाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरविण्याचा खर्च हा मनपा करते. परंपरेनुसार एका अंत्यसंस्काराला साडेसात मण लाकडाची आवश्यकता आहे. महापालिकेला शहरातील १० घाटांवर ५००० हजार टन लाक डे वर्षाला पुरवावी लागतात. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे तोडावी लागत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, वृक्षतोड थांबवावी यासाठी गोवऱ्याचा उपयोग करण्याचे आवाहन मनपाने केले आहे. हिंदू संस्कृतीत गोवरी ही पूजनीय आहे. शिवाय गोवरी ड्राय फ्युअल आहे. गोवऱ्या रिसायकल एनर्जी आहे. लाकडाप्रमाणेच गोवऱ्यावरही अगदी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केला जाऊ शकतो. लाकडाच्या तुलनेत गोवऱ्यांची राख कमी होते. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होते. घाटावर लाकडे पुरविण्यात होत असलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवता येतो. त्यासाठी गोवरी हा अतिशय उत्तम पर्याय महापालिकेने उपलब्ध केला आहे. यासाठी इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशनने या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. फाऊंडेशनचे बॅनर्स घाटावर लावण्यात आले आहे. ज्यांना गोवऱ्यावर अंत्यसंस्कार करायचा आहे, त्यांना ते गोवऱ्या उपलब्ध करून देतात. शिवाय मृताच्या आप्तस्वकीयांचे ते मन परिवर्तन करतात. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे गेल्या काही महिन्यात २४ अंत्यसंस्कार गोवऱ्यांवर झाले आहेत. त्याचबरोबर एलपीजी दहनवाहिनीलाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. घाटावरील कर्मचारी यासाठी मृताच्या आप्तस्वकीयांचे मनपरिवर्तन करीत आहे. यावर्षात अंबाझरी घाटावर आतापर्यंत एलपीजी दहनवाहिनीत १७० च्या जवळपास अंत्यसंस्कार पार पडले आहेत. (प्रतिनिधी)पत्र पाठवून करतात अभिनंदनपर्यावरणासंबंधी लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोवरी हा पर्याय सुचविण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावे म्हणून फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार गोवऱ्यांवर केले, त्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल पत्र पाठवून अभिनंदनही करण्यात येते. वृक्षचळवळ संवर्धनासाठी हा प्रयोग भविष्यासाठी फायद्याचा आहे. इकोफ्रेंडली अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कुटुंबीयांप्रमाणे इतरांनीही जागरुकता बाळगावी, असे आवाहन फाऊंडेशनने केले आहे.विवेक फडके, सचिव, इको फ्रेंडली लिव्हिंग फाऊंडेशन अंत्यसंस्कार विधिवत होतातविधिवत अंत्यसंस्कार व्हावेत, हा सर्वांचा उद्देश असल्याने, सर्वांचा आग्रह हा लाकडावर असतो. एलपीजी दहनवाहिनीवरही अंत्यसंस्कार विधिवत व्हावे यासाठी मनपाने उपाययोजना केल्या आहे. यासाठी दहनवाहिनीच्या पुढे विसावा बनविला आहे. यावर मृताचे आप्त फेरे घेऊ शकतात. दहनवाहिनीची बटन दाबल्यास अग्नी देण्याचा विधीही पूर्ण होऊ शकतो. पर्यावरण पोषक असल्याने दहनवाहिनीचे महत्त्व अनेकांच्या लक्षात आल्याने, अंत्यसंस्काराची प्रक्रिया विविधत होत असल्याचे लक्षात आल्याने अंबाझरी घाटावरील दहनवाहिनीत अंत्यसंस्काराची संख्या वाढली आहे. महिन्याला जवळपास २० ते २५ अंत्यसंस्कार दहनवाहिनीत होत आहे. अनवर करीम खान, दहनवाहिनीचे आॅपरेटर
कमी खर्च अन् पर्यावरणाचेही रक्षण
By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST