नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची ‘एनसीईआरटी’तर्फे (नॅशनल कौन्सिल आॅफ एज्युकेशन रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग) अवहेलना करण्यात येत असल्याच्या प्रकाराची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिल्याच्या मुद्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून यात बदल करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.इयत्ता सातवीच्या ‘हमारे अतित-२’ या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिली आहे. पुस्तकात नगण्य स्थान दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत महाराजांच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास योग्य तऱ्हेने पोहचत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासन याबाबत पुढाकार घेऊन केंद्र व ‘एनसीईआरटी’ला इतिहासात बदल करायला भाग पाडणार का, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तावडे यांची भेट घेतली. यासंदर्भात मुंबईला एक बैठक बोलवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये भाजपचे कल्याणचे आमदार श्री. नरेंद्र पवार, हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण शिकवण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
शिवरायांच्या इतिहासप्रकरणी केंद्राला पाठविणार पत्र
By admin | Updated: December 20, 2014 02:35 IST