दोन वर्षांत फक्त ८० बस परावर्तित : काम संथ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेली उपराजधानी प्रदूषणमुक्त व्हावी. यासाठी महापालिकेच्या डिझेलवर चालणाऱ्या शहर बस सीएनजीमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी याला सुरुवात करण्यात आली; परंतु परिवर्तनाचे काम संथ असल्याने असल्याने आजवर फक्त ८० बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात आल्या आहे. अशीच संथ गती कायम राहिल्यास ३०० बस सीएनजीत परिवर्तित करण्यासाठी पुढील सात वर्षे लागतील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी ३८० बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला होता. मनपाच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात ४६५ बस आहेत. यातील ८० बस गेल्या दोन वर्षांत परिवर्तित करण्यात आल्या आहेत. वास्तविक पहिल्या टप्प्यात १७३ व दुसऱ्या टप्प्यात २०७ बस परिवर्तित करण्याचे नियोजन होते.
विशेष म्हणजे, डिझेलवरील बस सीएनजीवर आणण्यासाठी मनपाचा निधी खर्च होणार नव्हता. हा खर्च बस सेवा संचालन करणाऱ्या कंत्राटदार कंपन्या करणार होत्या; परंतु मागील काही महिन्यांपासून कंत्राटदारांना मनपाने पैसे दिले नसल्याने त्यांनी हे काम थांबवले. याचा सीएनजी परिवर्तनाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यात मनपातील सत्तापक्षातील अंतर्गत वादात मागील काही महिन्यांपासून परिवहन सभापती पद रिक्त आहे. यामुळे बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनही याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.
....
मनपाच्या बस सीएनजीमध्ये परिवर्तित केल्यास इंधनावरील खर्चात मोठी बचत होईल. दुसरीकडे बसचे आयुष्य वाढेल. पर्यावरण संवर्धन यामुळे ३८० बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला. ८० बस परिवर्तित करण्यात आल्या. याला गती देण्याचा प्रयत्न आहे.
रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, परिवहन विभाग, मनपा
....
असे आहेत सीएनजी बसचे फायदे
-डिझेलच्या तुलनेत खर्च कमी
-प्रदूषण होत नसल्याने पर्यावरणपूरक वाहतूक
- बसच्या आयुष्यात पाच वर्षांनी वाढ
-कमी इंधनात अधिक धावते
-परिवहन विभागाचा तोटा कमी होण्याला मदत
............