नागपूर : नागपूरसह देशाच्या सर्व विमानतळांवरून विदेशात जाणाऱ्या विमानांवर ३० एप्रिलपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. आधी ३१ मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने बंद होती. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनने (डीजीसीए) ३० एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या विदेशासोबत करण्यात आलेल्या एअर बबल करारानुसार वंदे भारत अभियानांतर्गत विमानांचे संचालन होत आहे. दीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी असल्यामुळे विदेशात नोकरीसाठी किंवा रोजगार मिळविण्यासाठी गेलेले अनेक नागरिक अडकून पडले आहेत. बराच काळ आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्यामुळे नागपूरवरून कतार एअरवेजने आपले संचालन पूर्णपणे बंद केले. तर नागपूरवरून असलेले एअर अरेबियाचे शारजाह विमानही मे महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात कोणतेच आंतरराष्ट्रीय विमान जाऊ शकले नाही. अनलॉकनंतर राष्ट्रीय विमानांची संख्या पूर्ववत होत आहे. नागपूर विमानतळावरून दररोज ५४ विमानांचे संचालन होत आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी नागपूर विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या ६५ होती.