लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्ह्यात बेवारस स्थितीत आढळलेल्या उत्तरपत्रिकांच्या प्रकरणावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर जोरदार टीका होत आहे. या प्रकरणाला विद्यापीठाने गंभीरतेने घेतले असून चौकशी समिती गठित केली आहे. डॉ. नीरज खटी यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती एका आठवड्यात अहवाल देईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
‘लोकमत’ने या प्रकरणावर प्रकाश टाकल्यानंतर बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे हे स्वत: अधिकाऱ्यांसमवेत भंडाऱ्याला गेले. तेथे त्यांनी सर्व उत्तरपत्रिकांना स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत जप्त केले व गठ्ठे ‘सील’ करून विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आणले. उत्तरपत्रिका रस्त्यावर कशा पडल्या होत्या तसेच त्या जाणूनबुजून पाडल्या गेल्या की खरोखर ट्रकचा अपघात झाला होता, हे समितीच्या चौकशीत स्पष्ट होईल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. उत्तरपत्रिका घेऊन जाणाऱ्या कंत्राटदारालादेखील या प्रकरणात उत्तर मागण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पोत्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत उत्तरपत्रिका सापडल्या. यातील काही उत्तरपत्रिका जुन्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात किराणा दुकान, हातठेले, भाजीविक्रेते यांच्याकडे उत्तरपत्रिका सापडत आहेत. त्यांचा उपयोग खाद्य सामान तसेच भाजी बांधण्यासाठी करण्यात येत आहे. उत्तरपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने काही पोती खाली पडली, असे उत्तर कंत्राटदाराने दिले होते.