नरेश डोंगरे ल्ल नागपूरपोलिसांच्या अनास्थेमुळेच नेहा रमेश कठाळे या निष्पाप मुलीच्या नशिबी अनाथाचे जगणे अन् मरण्यानंतर बेवारसपणा आला. दहा वर्षांपूर्वी कळमना आणि जरीपटका पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवली असती तर नेहाच्या नशिबी जीवंतपणी अनाथपणा आणि संशयास्पद मृत्युनंतर विडंबना आली नसती. त्याचप्रमाणे ही घटना घडल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी घिसाडघाई केली नसती तर तिच्या नातेवाईकांना तिच्या अंतिम दर्शनापासून वंचित राहावे लागले नसते. सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या श्रद्धानंद अनाथालयातील नेहा कठाळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात ‘लोकमत’ने बारकाईने चौकशी केली, तिच्या परिवारातील सदस्यांशी चर्चा केली असता अनेक संतापजनक बाबी उघड झाल्या. वानाडोंगरी (हिंगणा) येथे राहणाऱ्या नेहाला आईची माया काय असते, हे कळण्यापूर्वीच तिची आई पुष्पा हिने ८ जुलै २००१ ला आत्महत्या केली. तेव्हा नेहा अवघ्या दोन वर्षांची होती. तिचे वडील रमेश कठाळे यांनी ५ मार्च २००३ ला कलावती नामक महिलेशी दुसरे लग्न केले. त्यामुळे पुष्पाचे भाऊ आणि नेहाचे मामा गोविंदराव खडसे यांनी नेहाला आपल्या घरी नेले. काही दिवस मामाकडे राहिल्यानंतर ती पुन्हा आपल्या वडिलांच्या घरी आली. यावेळी रमेश कठाळे आपल्या परिवारासह हिंगणा सोडून कळमन्यातील कुंदनलाल गुप्तानगर झोपडपट्टीत राहायला आले होते. नेहा गुप्तानगरातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकत होती. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असतानाच २५ मे २००६ ला सकाळी १० च्या सुमारास नेहा अचानक बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती आढळली नसल्याने वडिलांनी कळमना ठाण्यात २८ मे रोजी नेहाच्या बेपत्ता होण्याची तक्रार (मिसिंग क्रमांक ८९/०६) नोंदवली. पोलिसांनी थातूरमातूर नोंद केली आणि गप्प बसले. तिकडे दीड-दोन किलोमीटर अंतरावर जरीपटक्यात नेहा सापडली. पोलिसांनी अन्य ठाण्यात मिसिंगच्या तक्रारीची चौकशी न करता तिला श्रद्धानंद अनाथालयात दाखल केले. चिमुकली मिळत नसल्यामुळे रमेश कठाळे कळमना ठाण्याचे उंबरठे झिजवत होते. पोलिसांची नको ती तत्परता अनेकदा पोलीस बेवारस मृतदेह मेडिकलमध्ये ठेवतात. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतात. पोलिसांजवळ नेहाच्या वडिलांचे, मामांचे नाव होते. थोडी संवेदनशीलपणे चौकशी केली असती तर नागपुरातच राहणारे वडील किंवा माथनी मौद्यातील मामाचा पत्ता मिळू शकला असता अन् अखेरच्या वेळी तरी नेहाच्या नातेवाईकांना तिला बघता आले असते. मात्र, पोलिसांनी यावेळी तिचा दफनविधी करण्याची तत्परता दाखवली. दुसऱ्या दिवशी नेहाच्या संशयास्पद मृत्युच्या बातम्या वाचून नेहाचे नातेवाईक पोलिसांकडे आले अन् नंतर मोक्षधाममध्ये जमिनीत पुरलेल्या नेहाच्या समाधीवर छाती बदडून रडू लागले. नियतीचा सूड ‘ इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’४कविवर्य सुरेश भटांच्या या दोन ओळीत जगण्या-मरण्यापर्यंतच्या संघर्षाचा सार आहे. मात्र, जगताना प्रत्येक दिवस प्रतीक्षा अन् छळ सहन करणाऱ्या नेहाला मृत्यूनंतरही प्रतीक्षाच आली. नातेवाईकांना माहिती नसल्याने तिचा मृतदेह नेण्यासाठी ते येण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनाथालय प्रशासनानेही संतापजनक बेफिकीरी दाखवली. त्यामुळे अनेक तास तिचा मृतदेह शवागारात तसाच पडून राहिला. पोलिसांच्या तगाद्यामुळे अखेर अनाथालयातील कर्मचारी मेडिकलमध्ये पोहचले आणि नेहाचे शवविच्छेदन झाले.
निष्पाप नेहाच्या जगण्या-मरण्याचा संघर्ष
By admin | Updated: April 5, 2016 05:19 IST