नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामूहिक बलात्काराची तक्रार अविश्वासार्ह ठरवून दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण गडचिरोली जिल्ह्यातील आहे.
मोरेश्वर बाजीराव हलामी (२८) व सुरेश मंसाराम दखणे (३०) अशी आरोपींची नावे असून ते मालेवाडा, ता. कुरखेडा येथील रहिवासी आहेत. १५ नोव्हेंबर २०१७ रोजी सत्र न्यायालयाने या आरोपींना २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला.
२४ जानेवारी २०१४ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन्ही आरोपींनी महिलेला बळजबरीने नाल्यात ओढत नेऊन बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार होती. महिलेसोबत तिचा पती होता. मारहाण केल्यामुळे तो पळून गेला. महिला दुसऱ्या दिवशी उपचाराकरिता डॉक्टरकडे गेली. तिने डॉक्टरला बलात्काराची माहिती दिली आणि त्या डॉक्टरने यासंदर्भात पोलिसांना कळवले. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आरोपींच्या वतीने ॲड. अमित बंड व ए. डी. रामटेके यांनी बाजू मांडली.