लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात महामार्ग व रस्त्यांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. महामार्गांचे सर्वाधिक लांबीचे जाळे असलेल्या देशांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केपीआयटी स्पार्कल-२०२१ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमादरम्यान ते ऑनलाईन माध्यमातून बोलत होते.
देशातील प्रत्येक नागरिकाला परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रस्ते व महामार्गांचे जाळे वाढत असताना तरुण अभियंत्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी जुळण्याची आवश्यकता आहे. जलद वाहतूक व्यवस्थेसाठी तरुण अभियंत्यांची कल्पना, मदत मोलाची ठरणार आहे. शहरातील प्रत्येक भागात सेवा देऊ शकेल अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रिक किंवा जैविक इंधनाचा वापर आवश्यक आहे. सोडियम आयन, अॅल्युमिनियम, झिंक आयन व हायड्रोजनपासून निर्माण होणाऱ्या इंधनावर संशोधन सुरू आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.