नागपूर : व्यापाऱ्यांना आयकर संबंधित येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आयकर विभाग नेहमीच तत्पर असून मदतीसाठी कटिबद्ध आहे. सर्व व्यापाऱ्यांनी ‘विवाद से विश्वास’ योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन नवनियुक्त प्रधान मुख्य आयकर आयुक्त रुबी श्रीवास्तव यांनी येथे केले.
विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्त्वात चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी रुबी श्रीवास्तव यांची भेट घेऊन नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. श्रीवास्तव यांचे दुपट्टा, पुष्पगुच्छ व चेंबरच्या अमृत महोत्सव स्मरणिका ‘अमृतपुष्प’ देऊन स्वागत केले. मेहाडिया म्हणाले, श्रीवास्तव यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे नागपुरातील व्यापाऱ्यांना आयकर विभागाचे सहकार्य मिळेल आणि आयकर संबंधित प्रलंबित प्रकरणे कायदेशीर प्रक्रियेने त्वरित सोडविली जातील. चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, ‘विवाद से विश्वास’ योजनेमुळे व्यापाऱ्यांना आयकर संबंधित प्रकरणांवर न्याय मिळेल. चेंबरच्या प्रत्यक्ष कर उपसमितीचे संयोजक सीए संदीप जोतवानी यांनी आयकरात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली. जीएसटी, आरओसी, चॅरिटी आयुक्त आणि अन्य विभागांचे रिटर्न भरण्याची ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख पुढे वाढवावी.
या प्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव शब्बार शाकिर, विधान अग्रवाल उपस्थित होते.