वेलतूर : अचानक घराला आग लागल्याने, घरगुती साहित्य जळून खाक झाले. यात अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले. ही घटना वेलतूर येथील गंगानगर वाॅर्ड क्र. २ येथे बुधवारी (दि.२६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
वेलतूर येथील रहिवासी संदीप तुळशीराम सुकदेवे यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी सुकदेवे हे कामानिमित्त बाहेर गेले हाेते. गावकऱ्यांना आगीची बाब लक्षात येताच, त्यांनी मिळेल त्या साधनाने पाणी आणून आग विझविली. मात्र, ताेपर्यंत घरातील साहित्यांची राखरांगाेळी झाली हाेती. घटनेची माहिती पाेलीस स्टेशन व महसूल विभागाला देण्यात आली. त्यानुसार, ठाणेदार आनंद कविराज आणि तलाठी हंसदास शेवळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. तलाठी शेवळे यांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. आगपीडिताची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, शासनाने त्यांना मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.