३३ अधिकारी पोहोचले उशिरा : पुढच्या बैठकीला वेळेवर येण्याचे निर्देश नागपूर : अधिकाऱ्यांची लेटलतिफी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी खुद्द पालकमंत्र्यांनाही आला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ३३ अधिकारी उशिरा पोहोचले. याबाबत पलकमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत पुढच्या बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याची ताकीद दिली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सकाळी १० वाजता ही बैठक होती. आमदार महोदय वेळेआधीच उपस्थित होते. पालकमंत्री, जिल्हाधिकारी वेळेवर आले. परंतु अनेक अधिकारी पोहोचलेच नाही. हळूहळू एकेक अधिकारी पोहचू लागले. असे करीत विविध विभागांचे तब्बल ३३ अधिकारी उशिरा पाहोचले. उशिरा येणाऱ्या या अधिकाऱ्यांवर पालकमंत्री बावनकुळे यांची बारीक नजर होती. उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची नोंद केली जात होती. उशिरा येणाऱ्या या अधिकाऱ्यांची नावे जाहीरपणे वाचून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पुढच बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याची ताकीद देत आता माफ करीत असल्याचे सांगितले. अनेक अधिकाऱ्यांनी ३० जूनपर्यंत मागणी करण्यात आलेल्या विकास कामाचे प्रस्ताव न दिल्याबद्दल सुद्धा पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना धाकात ठेवून काम करता येत नाही. परंतु कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते. योग्य वेळ आली तर योग्य ती कारवाई केली जाईल असेही पालकमंत्री यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
‘लेटलतिफ’ अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांची ताकीद
By admin | Updated: August 13, 2016 02:15 IST