नागपूर : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले प्रेमदास मेंढे आणि नंदकुमार आत्राम यांना रविवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक राज कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक ए.पी. सिंग, कमांडंट मनोजकुमार ध्यानी, सेकंड कमांडंट सत्यप्रकाश, अतिरिक्त कमांडंट तोनसिंग, विभागीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिरीश पांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १२ जवान शहीद झाले. त्यात पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील प्रेमदास मेंढे, चंद्रपूर जिल्ह्यातील नंदकुमार आत्राम आणि भंडारा जिल्ह्यातील मंगेश बालपांडे यांचा समावेश असून मेंढे आणि आत्राम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने रविवारी येथे आणण्यात आले. विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्थिवांना पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)
नक्षली हल्ल्यातील शहीद जवानांना पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
By admin | Updated: March 13, 2017 02:18 IST