लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकबाकीदार वीजग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याच्या मोहिमेच्या विराेधात विदर्भवाद्यांनी सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन केले. राज्य सरकार वीजग्राहकांमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी जिल्हा व तहसील स्तरावर वीजकनेक्शन कापण्याच्या विरोधात विदर्भभरात धरणे आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात आयोजित आंदोलनात मार्गदर्शन करताना राम नेवले म्हणाले, वीज कर्मचारी हे पोलिसांना घेऊन वीजग्राहकांकडे जात आहेत. त्यांना भीती दाखवून कनेक्शन कापली जात आहेत. त्यांनी या मोहिमेचे सामूहिक विरोध करण्याचे आवाहन करत कापलेली वीज जोडण्याची मागणी केली. कापलेले कनेक्शन जोडून न दिल्यास नागरिकांनी ती स्वत: जोडून घ्यावीत, असे आवाहनही केले. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपले आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोपही करण्यात आला.
आंदोलनात मुकेश मासुरकर, प्रशांत जयकुमार, गणेश शर्मा, रेखा निमजे, सुनीता येरणे, वीणा भोयर, अजय शाहू, अशोक पटले. ज्योती खांडेकर, अन्ना राजेधर, रवींद्र भामोड़े, नरेश निमजे, गुलाबराव धांडे, राजेंद्र सतई, नितीन अवस्थी, सुयोग निलदावार, भीमराव फुसे, विजय मौदेकर, प्रफुल्ल बोबड़े, उषा लांबट, दुर्गाप्रसाद अग्रवाल, दिनेश मंथनपुरवार आदी सहभागी झाले होते.