काटोल : शेतकऱ्यांसाठी सध्या ई-पीक पाहणी ही डोकेदुखी ठरत आहे. अनेक शेतकरी शेतात यूट्यूब चित्रफितीच्या मार्गदर्शनानंतर नोंदणी करण्यासाठी गेले असता तेथे कधी नेटवर्क तर कधी एरर तर कधी फोटो काढल्यानंतर अक्षांश आणि रेखांश शोधण्यासाठी त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना पैसे देऊन इतरांकडून त्यांचे काम करून घ्यावे लागते आहेत. याचा त्यांचा आर्थिक भुर्दंडदेखील बसतो आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ते ई-पीक पाहणी करू शकत नाही. त्यामुळे त्यांची सामान्य पीक पाहणी व्यवस्था व्हावी यासाठी भारतीय किसान संघाने उपविभागीय अधिकारी काटोल यांच्यामार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यांत्रिक युगात ई-पीक पाहणीचे आम्ही स्वागत करतो. परंतु काही अडचणीमुळे सर्वच शेतकरी याचा वापर करू शकत नाही. म्हणजेच ते मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहिल्याने त्यांच्यावर अन्यायच होईल, असे भारतीय किसान संघाचे अध्यक्ष नाना आरवरे, उपाध्यक्ष रामराव घोंगे, साहेबराव भिसे, रवींद्र सावरकर, रामराव दुधे, सहमंत्री दिलीप ठाकरे, राजेंद्र कोंबे आदी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
ई-पीक पाहणीने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST