शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

अवयवदानाचे मोल प्रत्येकाने ओळखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

- तज्ज्ञांचा सूर : अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज सुमेध वाघमारे नागपूर : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, ...

- तज्ज्ञांचा सूर : अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज

सुमेध वाघमारे

नागपूर : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. एक मृतदेह ११ जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. परंतु योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी लढा देत आहेत. यामुळे वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणणे गरजेचे आहे, असे मत शहरातील विविध अवयवांचे प्रत्यारोपण तज्ज्ञ व डॉक्टरांनी मांडले.

अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’, अशी नवी म्हण पुढे येत आहे. उपराजधानीतील गेल्या सात वर्षांत टप्प्याटप्प्याने अवयवदानाचा आकडा वाढत आहे. परंतु अवयवदानाचे प्रमाण आजही अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामागे राहण्याची नेमकी कारणे कोणती? आजही समाजात याबाबत गैरसमज आहेत का? अवयवदानाच्या जनजागृतीकरिता शासन कमी पडते का? अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याकरिता काय करणे गरजेचे आहे? श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे का? अशा अनेक प्रश्नांवर डॉक्टरांनी चर्चा केली.

- ०.५ टक्केही अवयवदान होत नाही - डॉ. देवतळे ()

‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, लोकसंख्येच्या तुलनेत भारतात ०.५ टक्केही अवयवदान होत नाही. भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. कदाचित याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यातून मिळत नाही. नागपुरात ‘एम्स’, दोन वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय व ७०० वर छोटी व मोठी रुग्णालये आहेत. यामुळे उपराजधानीचे हे शहर ‘मेडिकल हब’ सोबतच ‘ऑर्गन डोनेशन सिटी’ म्हणून ओळख व्हावी, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.

- यकृताच्या प्रत्यारोपणासाठी ‘लिव्हिंग डोनर’ गरजेचे - डॉ. सक्सेना ()

यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना म्हणाले, मधुमेह, रक्तदाब व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती ‘लिव्हर सिरोसिस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात ‘लिव्हर कॅन्सर’ मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे. यकृत हे जिवंतपणी (लिव्हिंग डोनर) व मेंदूमृत व्यक्तीकडून (कॅडेव्हेरिक डोनर) घेता येते. ‘लिव्हिंग डोनर’मध्ये यकृताच्या उजव्या भागातील ५० ते ६० टक्केच भाग घेतला जातो. दात्याचे यकृत सात ते आठ आठवड्यात पुन्हा ‘रिजनरेट’ होते. तर मेंदूमृत व्यक्तीकडून पूर्ण यकृत घेतले जाते. वाढते रुग्ण पाहता ‘लिव्हिंग डोनर’ वाढणे गरजेचे आहे.

- त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही - डॉ. जहागीरदार ()

प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार म्हणाले, त्वचा प्रत्यारोपणातून (होमोग्राफ्टिंग) गंभीर स्वरूपाच्या जळीत रुग्णांना वाचविणे शक्य आहे. परंतु, समाजात त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही. त्यातुलनेत मेंदूपेशी मृत रुग्णांचे अवयवदान वाढले आहे. अन्य अवयवाप्रमाणे त्वचादानाबाबतीत मृताचे नातेवाईक फारसे तयार नसतात. काही गैरसमज असल्याने ते त्वचादानासाठी पुढाकार घेत नाहीत. विशेष म्हणजे, त्वचादानामुळे विद्रुपपणा येत नाही. त्वचेच्या वरचे केवळ दोनच स्तर काढले जातात. नागपुरात आतापर्यंत केवळ ४५ मृताकडून त्वचा दान झाले आहे. त्वचादानाबाबत जनजागृती वाढविणे गरजेचे आहे.

- मूत्रपिंड दानाचे महत्त्व ओळखावे - डॉ. साल्पेकर ()

मूत्रपिंड रोग तज्ज्ञ डॉ. सुहास साल्पेकर म्हणाले, जगात दरवर्षी मूत्रपिंडाचे (किडनी) १५ लाखांवर नवे रुग्ण आढळून येतात. भारतात याचे प्रमाण दोन ते तीन लाख आहे. नागपूरचा जर विचार केला तर दिवसभरात एक नवा रुग्ण आढळून येतो. मधुमेहामुळे १०० मधून ३३ रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार होतो. मागील काही वर्षांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, इतर अवयवांच्या तुलनेत मूत्रपिंडाची मागणी मोठी आहे. सध्याच्या स्थितीत भारतात अडीच लाख रुग्णांना मूत्रपिंडाची गरज आहे. ‘लिव्हिंग डोनर’ व ‘कॅडेव्हेरिक डोनर’ या दोन्हीकडून मूत्रपिंड मिळू शकते. परंतु जिथे नातेवाईक तयार नसतात किंवा टिश्यू जुळत नाही तिथे रुग्ण अडचणीत येतो. त्याला ब्रेन डेड’ रुग्णाची गरज भासते. परंतु प्रतीक्षेची यादी मोठी असल्याने रुग्णाला महिनोनमहिने वाट पाहण्याची जीवघेणी वेळ येत आहे. हे थांबविण्यासाठी अवयवदानाला महत्त्व देणे आवश्यक आहे.

- अंधत्व दूर करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक - डॉ. अळसी ()

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी अळसी म्हणाल्या, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे. यामुळे अनेक लोकांचे अंधत्व दूर करणे शक्य आहे. भारतात अंधश्रद्धा, गैरसमज व इच्छा असतानाही नेत्रदानाची माहिती नसल्याने नेत्रदानाला गती आलेली नाही. जगात ४ कोटी ५० लाख लोक अंध आहेत. यामध्ये १ कोटी ५० लाख रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातील ६० लाख रुग्णांना बुबुळाचे अंधत्व आहे. यात दरवर्षी ३० हजार रुग्णांची भर पडते. यामुळे अंधत्वाचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढत आहे. सरकारने यात लक्ष घालून कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.

- अवयवदानासाठी जनसामान्यांनीच पुढे यावे - डॉ. खंडाईत ()

आयएमएच्या माजी अध्यक्ष व अवयवदानासाठी पुढाकार घेतलेल्या डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, ज्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्यामागे सरकारी यंत्रणेचा कमी पुढाकार हे मुख्य कारण आहे. यामुळे जनसामान्यांनीच पुढे यावे, घरातील मृत माणसाचे अवयव दान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.