लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात कृतियुक्त उपक्रम राबविण्यात यावे. शाळेत झालेले संस्कार आयुष्याची शिदोरी असते. प्रत्येक शाळा पर्यावरणाचे विद्यापीठ व्हावे. निसर्ग माणसाला बदल करायला शिकवितो, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. राष्ट्राचे शिल्पकार शिक्षक असल्यामुळे शाळेतील कृतितून पर्यावरण शिक्षण मिळावे, असे मत अमेरिका येथील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. संगीता तोडमल यांनी केले. शासनाच्या ‘माझी वसुंधरा’उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने आयाेजित ग्रेट भेट उपक्रमात त्यांनी संवाद साधला.
वेध प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी ‘ग्रेट भेट’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकरिता ‘पर्यावरण शिक्षण’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये अमेरिका येथून डॉ. संगीता तोडमल यांनी मार्गदर्शन केले. पुढे बाेलताना डॉ. तोडमल म्हणाल्या, विचाररूपी सोन्याचा धूर भारतात निघतो. जगाचे लक्ष भारताकडे आहे. कारण भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेतील फुलांना सुगंध नसतो, मात्र आपल्या भारतात फुलांसोबत मातीलाही सुगंध आहे. विचार रुजला तर संस्कार रुजतात. संस्कारातूनच माणूस मोठा होतो आणि माणूस मोठा झाला की राष्ट्र मोठे होते. निसर्गाला आव्हान न देता निसर्गाशी समरस होऊन जगायला शिकले पाहिजे, असे मार्मिक विचार त्यांनी मांडले. प्रास्ताविक वेधचे सचिव खुशाल कापसे यांनी केले. संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार डॉ. मनोहर नरांजे यांनी मानले. वसंत गोमासे, नीलेश वाघ, मनोज नन्नावरे, जयंत पंडित, सचिन अवघड, किशोर रोगे, अपर्णा डोईफोडे, धनंजय पकडे आदींनी सहकार्य केले.