हायकोर्ट : जनहित याचिकेवरील सुनावणी तहकूबनागपूर : कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राचा तातडीने विकास व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणात उत्तर सादर करण्यासाठी शासनाने बुधवारी न्यायालयाला तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. न्यायालयाने शासनाची विनंती मंजूर करून सुनावणी तहकूब केली.याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कुणाल राऊत असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. २ जानेवारी २०१२ रोजी मंत्रिमंडळाने डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विस्तारासाठी येणारा खर्च, जमिनीची उपलब्धता, सुविधा इत्यादीचा प्रस्ताव सादर केला होता. २० मार्च २०१२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने यासंदर्भात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पत्र लिहिले होते. शासनाच्या अधिसूचनेनुसार डॉ. आंबेडकर रुग्णालय मेयोच्या देखरेखीखाली आहे. २५ जून २०१४ रोजी महसूल विभागाने डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विकासाकरिता समिती स्थापन केली आहे. तसेच, १९ मार्च २०१५ रोजी रुग्णालयाच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते. परंतु, विकासाकरिता अद्याप काहीच ठोस हालचाली सुरू झाल्या नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विकासावर उत्तरासाठी वेळ
By admin | Updated: September 1, 2016 03:09 IST