नागपूर : मोठ्या आई-वडिलांसह लग्न समारंभाला जाण्यासाठी निघालेल्या बालकावर टिप्परच्या रूपातील काळाने झडप घातली. बालकाचा मृत्यू झाला तर त्याचे मोठे वडील आणि आई गंभीर जखमी झाली. नंदनवनमधील खरबी ते वाठोडा रिंगरोडवर मंगळवारी दुपारी ११.५० ला हा भीषण अपघात घडला. हुडकेश्वर खरसोली येथील रहिवासी सोपान पेठे यांच्या नातेवाईकाचे लग्न आज पारडीत होते. त्यासाठी सोपान पेठे त्यांची पत्नी संगीता आणि मुलगी अपूर्वा तसेच काही नातेवाईकांसह सकाळीच तिकडे गेले तर, सोपान यांचा मुलगा आयुष (वय ११) आपल्या मोठ्या वडिलांकडे थांबला. दुपारी आयुष त्याचे मोठे वडील ज्ञानेश्वर पेठे आणि मोठी आई वनिता यांच्यासह अॅक्टिव्हाने पारडीकडे निघाले. मागून आलेल्या टिप्पर (एमएच ३१/ ईएन ०७३६) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पेठेंच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे तिघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. आयुषला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. अरुण घोडबाजी पेठे (वय ५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालक रवींद्र शंकरराव बोरकर (वय ४०, रा. पडोळेनगर, हिवरीनगर झोपडपट्टी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. (प्रतिनिधी) लग्न समारंभात शोककळाया घटनेचे वृत्त लग्न समारंभात कळताच तेथे शोककळा पसरली. अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. वनिता आणि ज्ञानेश्वर पेठे यांच्यावर उपचार सुरू आहेत. आयुषच्या मृत्यूने पेठे परिवाराला जबर मानसिक धक्का बसला आहे.
टिप्परच्या धडकेत बालकाचा मृत्यू
By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST