सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारत असल्यास ठीक, गंभीर होत असल्यास मेडिकलला पाठव, अशी काहीशी वृत्ती खासगीसह इतर जिल्हा व सामान्य रुग्णालयांची आहे. परिणामी, मेडिकलमध्ये मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. ५५ दिवसामध्ये ‘रेफर’ होऊन मेडिकलमध्ये आलेल्या ८१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. याची चौकशी होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय, या रुग्णांमुळे व त्यांच्या नातेवाईकांकडून नागपूर जिल्ह्यात कोरोना तर वाढत नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच मेडिकलमध्ये ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. त्यावेळी रुग्णांची संख्या कमी होती. परंतु रुग्ण वाढताच जिल्ह्यास्तरावरही कोविड हॉस्पिटल, तहसीलस्तरावर कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. शहरात खासगी कोविड हॉस्पिटलची संख्या वाढवून ती ९० वर नेण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालये फुल्ल झाली होती. परंतु ऑक्टोबरपासून कोरोनाची गती मंदावली. डिसेंबर व जानेवारी महिन्यात अनेक खासगी कोविड इस्पितळातील ९० टक्के खाटा रिकाम्या झाल्या. असे असताना कोरोनाचे गंभीर झालेले रुग्ण मेडिकलमध्ये पाठविणे सुरूच आहे. कोरोनावर औषधोपचार नाही. आतापर्यंतचा अनुभव व आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचार केला जात आहे. हाच उपचार इतरही कोविड रुग्णालयात उपलब्ध असताना गंभीर स्थितीतील रुग्ण मेडिकलमध्ये पाठविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-खासगी हॉस्पिटलमधून रेफर रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण मोठे
मागील दोन महिन्यात शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमधून २९ रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. विशेष म्हणजे, खासगीमध्ये ऑक्सिजनपासून ते आयसीयूची सोय असताना गंभीर रुग्णांना मेडिकलला पाठविले जात आहे. यात प्रवासादरम्यान रुग्ण आणखी गंभीर होत असल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामागे हॉस्पिटलमधील मृत्यूदर कमी दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
- भंडाऱ्यातून ११ तर अमरावतीमधून आले ५ रुग्ण
१६ डिसेंबर ते ९ फेब्रुवारी यादरम्यान भंडारा जिल्ह्यातून ११, अमरावती जिल्ह्यातून पाच, यवतमाळ जिल्ह्यातून दोन, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी चार, गडचिरोली जिल्ह्यातून तीन, वर्धा जिल्ह्यातून दोन तर नाशिकमधून एका रुग्णाला मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला.
- मध्य प्रदेशातील १० रुग्ण
५५ दिवसात मध्य प्रदेशातून १० तर नागपूर ग्रामीण भागातून १० रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तज्ज्ञानुसार, यातील अनेकांची प्रवासादरम्यान ऑक्सिजनची पातळी योग्य राखली गेली नव्हती. त्यापूर्वी त्यांच्यावर योग्य उपचारही झाले नसल्याने मेडिकलमध्ये अशा रुग्णांचे २४ ते ४८ तासात मृत्यूचे प्रमाण मोठे होते.
- रेफर केलेले ठिकाण व रुग्णसंख्या
खासगी हॉस्पिटल : २९
नागपूर ग्रामीण : १०
मध्य प्रदेश : १०
भंडारा : ११
अमरावती : ५
गोंदिया : ४
चंद्रपूर : ४
गडचिरोली : ३
यवतमाळ : २
वर्धा : २