उमरेड : शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या पुरातन गांधी सागर तलाव परिसरात सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या परिसरातच रस्त्याच्या मध्यभागी असलेला इलेक्ट्रिक खांब नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याच परिसरातून मत्स्य बाजारपेठ येत असून सोमवारी आठवडी बाजारासाठीसुद्धा हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरत असतो. अशा महत्त्वाच्या ठिकाणीच रस्त्याच्या मध्यभागी इलेक्ट्रिक खांब आणि तार असल्याने दुचाकी, चारचाकी आणि विद्यार्थ्यांसाठी अडचण निर्माण होत असते. नगरपालिका, विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावर भाजी बाजार असल्याने भाजी विक्रेते वाहनांवर भाजीपाला घेऊन जातात. यातच अनेकदा अपघातांचा सामनासुद्धा करावा लागला असल्याची बाब व्यक्त होत आहे. अगदी काही अंतरावरच नगरपालिका कार्यालय आहे. अशावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना ही बाब लक्षात का येत नाही, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे. नगरपालिका एखाद्या दुर्घटनेनंतर पाऊल उचलेल काय, असा सवालही विचारला जात आहे.
रस्त्याच्या मध्यभागी जीवघेणा इलेक्ट्रिक खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST