भरकटलेला पोलीस तपास : सुमो अंगावर घालून खुनाचे प्रकरण, आरोपी पती पोलीस कॉन्स्टेबल निर्दोषराहुल अवसरे नागपूरनंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदमारी रस्त्यावर टाटा सुमो अंगावर घालून सुवर्णा सुरेश माळी या ३३ वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. भरकटलेला पोलीस तपास, शिवाय दोन सख्ख्या बहिणीच फितूर झाल्याने सबळ पुराव्यां अभावी संशयाचा लाभ मिळून आरोपी पती पोलीस कॉन्स्टेबल न्यायालयात निर्दोष ठरला. त्यामुळे मृत सुवर्णा न्यायवंचितच राहिली. सुरेश सदाशिव माळी, असे आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो नंदूरबार पोलीस दलात शिपाई होता आणि तळोदा पोलीस ठाण्यात तैनात होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, भांडेवाडी भागात राहणारी पूर्वाश्रमीची सुवर्णा कैलास सोमकुंवर ही २००८ मध्ये मुंबईहून दादर एक्स्प्रेसने नागपूरला परतत असताना रेल्वे डब्यात तिची सुरेश माळीसोबत ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सुरेश हा सुवर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुरेशचेही अन्य एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दोघांमध्ये कडाक्याची भांडणे होत होती. त्यामुळे सुवर्णा माहेरी राहण्यास आली होती. ४ जुलै २०१४ रोजी सुरेशने मोबाईलवर संपर्क करून सुवर्णाला चांदमारी भागात बोलावले होते. त्या दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास ती पारडीला जात असल्याचे सांगून सायकल घेऊन भांडेवाडी येथील भावाच्या घरून निघाली होती. चांदमारी मंदिराच्या भागात रस्त्यावर सुवर्णाच्या अंगावर टाटा सुमो घालून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपी पळून गेला होता. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत महिलेचीही ओळख पटली नव्हती.तर भोसकल्याची जखम कशी ?नागपूर : तब्बल सात दिवसानंतर ११ जुलै २०१४ रोजी सुवर्णाचा भाऊ साहेबराव सोमकुवर, काका नरेश सोमकुवर, बहिणी ज्योतिका लोखंडे, सलिता सोमकुवर आणि शेषराव लोखंडे यांनी नंदनवन पोलीस ठाणे गाठून ओळख पटवली होती. साहेबराव कैलास सोमकुंवर यांनी आपल्या बयाणात संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सुरेश माळी याला १४ जुलै २०१४ रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याने खुनाची कबुली दिली होती. लाल रंगाची एमएच-३५-२६५२ क्रमांकाची टाटा सुमो सुवर्णाच्या अंगावर घालून खून केल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनी ही सुमो जप्त केली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते. प्रकरण अंगावर टाटा सुमो घालून खुनाचे असतानाही शवविच्छेदन अहवालात इतर जखमांव्यतिरिक्त एका जखमेचा उल्लेख भोसकल्याची जखम असा होता. संशय निर्माण करणाऱ्या या जखमेचा उल्लेख आरोपपत्रात नव्हता. घटनास्थळापासून २०० मीटरवर सायकल पडलेली होती. ती जप्ती पंचनाम्यात दर्शविण्यात आली नव्हती. मृत सुवर्णाचा मोबाईलही जप्त करण्यात आला नव्हता. त्यामुळे सीडीआर आणि टॉवर लोकेशन पोलिसांना प्राप्त करताच आले नाही. गुन्ह्यासाठी वापरलेली टाटा सुमो पंचासमक्ष जळगाव मुक्ताईनगर येथून जप्त करण्यात आली होती. जप्ती पंचन्याम्यात नंदूरबार जिल्ह्याचा उल्लेख होता. तपास अधिकाऱ्याने आरोपीची प्रेयसी म्हणून एका तरुणीला साक्षीदार म्हणून हजर केले नव्हते. साक्ष देताना तिने चक्क नकार दिला होता. वास्तविक तिला आरोपी करायला हवे होते. मृत महिलेच्या दोन्ही बहिणींनी आणि बहीण जावयाने साक्ष देताना सरकार पक्षाला मदत केली नाही. ते न्यायालयात फितूर झाले. आरोपीसोबत सुवर्णाचे संबंध चांगले होते, असे त्यांनी साक्षीत सांगितले. एकूणच सबळ पुराव्यांअभावी आरोपी पोलीस शिपाई सुरेश माळी निर्दोष ठरला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
मृत सुवर्णा न्यायवंचितच
By admin | Updated: September 2, 2016 02:46 IST