लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विसाव्या शतकात मराठी साहित्यविश्वात सैद्धांतिक घटनांची नोंद फार उणिवेने आहे. पोटवाद, तृष्णावाद व देशीवाद हे तीनच टप्पे मराठीत दिसतात. मात्र, देणगीच्या बाबतीत म्हणाल तर मराठी साहित्याकडून भारतीय साहित्यविश्वाला दलित व देशीवाद ही मोठी देणगी असल्याचे मत प्रसिद्ध साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य राजन गवस यांनी व्यक्त केले.
साहित्य अकादमी, मुंबईच्या वतीने विसाव्या शतकातील मराठी साहित्यावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन सल्लागार मंडळाचे सदस्य व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. प्रमोद मुनघाटे, रंगनाथ पठारे, साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते.
विसाव्या शतकापूर्वी गद्य साहित्याचा धाक निर्माण होण्यात स्वातंत्र्य क्रांतीचा ध्यास होता. त्यातून विसाव्या शतकात प्रवेश करताना कथाकार वर्ग निर्माण झाला आणि त्यांनी अधिराज्य गाजवले. मात्र, बेसुमारता प्रकर्षाने जाणवायला लागली. त्यांच्याच कोडकौतुकात वाङमयीन जीवन खर्ची गेल्याचे दिसते. त्यानंतर १९६० पासून मराठी साहित्यात कादंबरी, कवितांची घुसळण झाली. दलित साहित्यातून वेदना केंद्रस्थानी राहिल्या. हा काळ आत्मकथनांनी व्यापला होता. मात्र, या काळात साहित्याचा कोणताही प्रकार समाजमनावर प्रभाव टाकेनासा होता आणि आहे. समाजमनाला प्रतिक्रिया न देण्याच्या या प्रकारामुळे साहित्याचा समाजमनावरील प्रभाव ओसरत गेल्याचे राजन गवस म्हणाले. प्रा. प्रमोद मुनघाटे यांचे बिजभाषण झाले.
वाङ्मयातील संकुचितता संपावी
विसाव्या शतकात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर नीतिमूल्ये ढासळल्याचे प्रकर्षाने जाणवायला लागले आणि मराठी साहित्यात डाव्या विचारांचे प्राबल्य वाढले. याच काळानंतर दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्याने उचल खाल्ली. मात्र, या साहित्यविश्वाला पुढे नेणारा कुणी सापडला नाही. आता त्याला खतपाणी दिले जात असले तरी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद फुटकळ असल्याने, साहित्यातील संकुचितता संपली पाहिजे, असे सदानंद मोरे उद्घाटन भाषणात म्हणाले.