पाण्याच्या ३०० नमुन्यांची दररोज तपासणी
दूषित घटक तपासून काढले जातात - दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या विकासासोबतच शहराची लोकसंख्या वाढत आहे. याचा भार महापालिकच्या मूलभूत सुविधांवर पडत आहे. अशा परिस्थितीत दूषित पाण्यामुळे आजार होण्याचा धोका असल्याने शहरातील २५ लाख नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मनपाच्या जलप्रदाय विभागातर्फे सर्व झोनमधून दररोज पाण्याचे ३०० नमुने घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या प्रयोगशाळेत त्यातील दूषित घटक तपासले जातात.
नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० ते ६५० एमएलडी पाणीपुरवठा होत असून प्रति माणसी १५० लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहरालगतच्या नेटवर्क नसलेल्या भागत टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी अधिक असते. याचा विचार करता सर्व भागात पाणीपुरवठा व्हावा यासाठी ६३ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. अमृत योजनेतून लवकरच २३ जलकुंभ पुन्हा उभारले जाणार आहेत. शहरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाच जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत.
....
बॉक्स...
महापालिकेच्या दहा झोन क्षेत्रातील वेगवेगळ्या भागातून दररोज ३०० पाणी नमुने तपासणीसाठी गोळा केले जातात. केंद्र व राज्य सरकारच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. यातील बॅक्टेरिया व दूषित घटक तपासले जातात. तसेच नागरिकांची दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार असल्यास झोन स्तरावर दखल घेऊन पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात.
.....
नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा
नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मनपाच्या सर्व झोनमधून दररोज ३०० नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासले जातात.
डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता,सा.आ.अभियांत्रिकी मनपा
.....
शहराची लोकसंख्या -२५ लाख
प्रती माणसी दररोज पाणीपुरवठा -१५० लिटर
पाणी वितरणासाठीच्या टाक्या -६३
जलशुद्धीकरण केंद्र -५
दररोज तपासण्यात येणारे पाणी नमुने -३००
....