नागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता १५ ते २१ मार्च दरम्यान नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु शहरातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्यानुसार ही दुसरी लाट असावी. यामुळे पहिल्यापेक्षा ती मोठी असणार, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
- पहिलीच्या तुलनेत आता धोका जास्त - डॉ. जय देशमुख
वरिष्ठ फिजीशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोनाची ही दुसरी लाट असावी आणि पहिल्या लाटेच्या तुलनेत ही जास्त धोकादायक ठरू शकेल. मागील वर्षीच्या तुलनेत आता कोरोना वेगाने पसरताना दिसून येत आहे. एकाच घरात दोनपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. लसीकरणाची संख्या वाढल्याने काहीशी बेफिकिरी आली आहे. यामुळे काही लक्षणे दिसूनही किंवा बाधितांच्या संपर्कात येऊनही संशयित रुग्ण वेळीच तपासणी करीत नाहीत. आजार वाढल्यावरच डॉक्टरांकडे जात आहेत. अशा रुग्णांकडून ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. आजाराची गुंतागुंत वाढली आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन झाले का, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
- पुढील काही दिवस धोक्याचे - डॉ. अशोक अरबट
श्वसनरोग विकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहता पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात. यामुळे कोरोनाचे प्रतिबंधक नियम अधिक काटेकोरपणे पाळणे, विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एकाच घरात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. यामुळे लक्षणे आढळताच निदान करणे, पॉझिटिव्ह आल्यास स्वत:ला क्वारंटाइन करणे व उपचार घेणे आवश्यक आहे. कोरोना वाढण्यामागे प्रशासनाची चूक नाही तर ही चूक आपली आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने, कोरोनाचे प्रतिबंधक नियम न पाळल्याने कोरोना वाढताना दिसून येत आहे. यामुळे आता तरी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे.
-६० वर्षांवरील रुग्णांमध्ये धोका वाढला - डॉ. अश्विनी तायडे
संसर्गजन्य आजार रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा कमी झाला होता तेव्हा आपण हवी ती काळजी घेतली नाही. यामुळे आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येतील. सध्याच्या स्थितीत कोरोनाचे ६० वर्षांवरील अधिक रुग्ण दिसून येत आहेत. त्यांना इतरही आजार असल्याने कमी दिवसांत त्यांच्यात आजाराची गुंतागुंत वाढत आहे. यामुळे अधिक काळजी घेणे, स्वत:ला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.