लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान नदीमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. वीज प्रकल्प तसेच कोळसा खाणींसोबतच कारखाने व नळांतील पाणी विनाप्रक्रिया नदीमध्ये सोडले जात आहे, असा आरोप ग्रामोन्नती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना भेटून निवेदन सादर केले.
कन्हान नदीच्या संगमात सर्व दिशांनी पाणी एकत्रित होते. परिसरातील कोळसा खाणीतून निघणारे पाणीदेखील तेथे सोडले जाते. कामठी, मौदा, खापरखेड़ा, सावनेर येथील ‘ड्रेनेज’चे पाणी आणि उद्योगांचे पाणीदेखील नदीत मिसळत आहे. सोबतच नदीच्या किनाऱ्यावर अंतिम संस्कारदेखील होत आहे. कोलार, बीना संगम व कन्हानमध्ये रक्षाविसर्जनदेखील होते. हरित लवादाने यासंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालनदेखील होत नसल्याचे चित्र आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील स्थानिक आस्थापनांना नोटीस जारी केली आहे, मात्र कारवाई झालेली नाही. जर नदीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, महेश काकड़े, गणेश भोंगाड़े, प्रवीण गोडे, नीलेश गाडगे, प्रवीण जुमले, राजू तुमसरे, ऋषभ बावनकर इत्यादी उपस्थित होते.
मनपा क्षेत्रातील ४०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया नाही
मनपा क्षेत्रामध्ये ७५० एमएलडी पाणी दूषित होत आहे. यातील ४०० एमएलडी पाणी प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात आहे. मनपाकडे ३५० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कन्हान नदीचे प्रदूषण वाढत आहे, असा दावा ग्रामोन्नती प्रतिष्ठानने केला आहे.