पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र : महावितरणची मनमानी, रब्बी पिकांचीही हानीचांदूरबाजार : वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे सिंचनाचा लाभ घेता येत नाही. परिणामी सततच्या नुकसानीला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा बोराळा रोहित्राशी संलग्न त्रस्त शेतकरी श्रीमंत शेकार यांच्यासह पंधरा शेतकऱ्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे. पावसाचा अनियमितपणा, नापिकी, दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकरी विहिरीतील पाण्याने रबी पीक टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना विहिरीत पाणी असूनही सिंचनाची सोय करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीची हानी होते. नादुरुस्त वीज यंत्रणा व जळालेल्या रोहित्राला पर्याय नसल्याने रबी पीकही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. चांदूरबाजार ते अमरावती मार्गावरील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावर मर्यादेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हे रोहित्र वारंवार निकामी होते. परिणामी या रोहित्रावर अवलंबून असलेल्या सुमारे २६ शेतकऱ्यांचे सिंचन रखडले आहे. आधीच खरीप पिके हातून गेली. तालुक्यात ३५ दिवसांत तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बोराळा रोहित्राशी संलग्न १५ शेतकऱ्यांनी नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करुन यावरील जादा जोडण्या आठवडाभरात काढून नवीन रोहित्र देण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात या १५ शेतकऱ्यांनी दिला आहे.
सिंचनासाठी १५ शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्या इशारा
By admin | Updated: December 12, 2014 00:32 IST