- रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे : नागपूर सीए शाखेतर्फे सहकारी बँक परिषद
नागपूर : सहकारी बँका देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग असून काळाच्या ओघात बँकांनी विकासासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि अनुशासित दृष्टिकोन अवलंबण्याची गरज असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी येथे व्यक्त केले.
आयसीएआयडब्ल्यूआयआरसीच्या नागपूर सीए शाखेतर्फे शहरी सहकारी बँकांसाठी लागू तरतुदींवर दोन दिवसासाठी सहकारी बँकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र व छत्तीसगड येथून ५० पेक्षा जास्त शहरी सहकारी बँकांनी भाग घेतला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सतीश मराठे बोलत होते. ते म्हणाले, कोणत्याही चुकीच्या कामांच्या प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँक सक्रिय होते आणि बँकर्स व लेखा परीक्षकांना उपाय सुचविते. सध्या लघु आणि सूक्ष्म उद्योग तणावात असून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. सामान्य जनतेला लाभ आणि सुरक्षेसाठी काम करताना बँकांनी परिचालन गुंतवणुकीची तपासणी करावी. बँकर्सचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी करण्यात आलेल्या अनोख्या परिषदेच्या आयोजनासाठी नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया यांची प्रशंसा केली. मराठे यांनी सार्वजनिक धनाची सुरक्षा करताना सहकारी बँकांना सांभाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे उचलण्यात आलेली पावले आणि कारवाईची माहिती दिली.
आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए मुकुंद चितळे यांनी रिझर्व्ह बँकेच्या नवनवीन संशोधनाची चर्चा केली आणि शहरी सहकारी बँकांंच्या भविष्यावर माहिती दिली. सध्या लहान बँकांचा मोठ्या बँकांमध्ये विलय होत आहे. बँकांच्या व्यवस्थापन बोर्डासह सीईओ, सीएफओ आणि बँकिंग कर्मचाऱ्यांनी सहकारी बँकांवर लागू सर्व नवीन तरतुदींचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष सीए मनीष गाडिया म्हणाले, सर्व क्षेत्राला कर्ज देण्यासह पैसे जमा करण्यात सहकारी बँकांची महत्त्वाची भूमिका आहे. सीए साकेत बागडिया म्हणाले, सहकारिता एक आंदोलन आणि लोकांची सेवा आहे. आयोजनासाठी सीए अनिल पारख आणि सीए तुषारकांती डबले यांचे आभार मानले.
या प्रसंगी सीए अभिजित केळकर, सीए जयदीप शाह, सीए श्रीनिवास जोशी, सीए चंद्रशेखर चितळे, सीए संदीप वेलिंग, सीए शेखर देसाई, सीए श्रीराम देशपांडे, सीए आनंद देसाई, सीए मितिल चोकशी, सीए राजीव चंद उपस्थित होते. संचालन सीए जितेन सगलानी, सीए संजय अग्रवाल, सीए अक्षय गुल्हाने, सीए किरीट कल्याणी, सीए सुरेन दुरगकर यांनी केले.