भिवापूर : महामार्गावरील अपघात, घटना व हालचाली टिपण्याकरिता नगर पंचायतीकडून लावण्यात आलेले सीसीटीव्ही गत महिनाभरापासून बंद आहेत. ते तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी जय संघर्ष वाहन चालक संघटनेने केली आहे. याबाबत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे व मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांना निवेदन देण्यात आले.
नगर पंचायतीच्या वतीने राष्ट्रीय मार्गावरील सिद्धार्थनगर, कोष्टीपुरा शाळा, आंभोरा रोड चौक, बसस्थानक व तहसील कार्यालय परिसरातील चौकात सीसीटीव्ही लावण्यात आले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरून दररोज असंख्य सुसाट वाहने धावतात. एखादा अपघात किंवा घटना घडल्यास यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचे ठरतात. मात्र अल्पावधीतच कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे मुख्य ठिकाणावरील हालचाली, घटना, अपघात व त्यातील गुन्हेगारांचे मुखवटे शोधणार कसे, हा प्रश्नच आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे प्रकाश इंगळे, सुधाकर कामडी, दीपक श्रीरामे, लक्ष्मण लोडे, युवराज पाल आदींचा सहभाग होता.
--विद्युत पुरवठा खंडित------------
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे विद्युत बिल न भरल्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे शहरभरातील सीसीटीव्ही बंद आहेय. हे सर्व कॅमेरे पोलीस स्टेशनशी जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये बसल्या जागेवरून महामार्गावरील घटना घडामोडीवर नजर ठेवण्यास मदत होते. मात्र कॅमेरेच बंद असल्यामुळे आता पोलिसांनाही त्रास होत आहे. नगर पंचायतीचे अधीक्षक दुगदेव तिमांडे यांनी सांगितले की, दोन दिवसापूर्वीच कॅमेऱ्यांच्या विद्युत देयकांचा भरणा करण्यात आला असून, कॅमेरे सुरू करण्याबाबत संबंधितांना पत्र दिल्याचे सांगितले.
020921\img-20210901-wa0060.jpg
तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ