उमरेड : तालुक्यातील बारव्हा येथील रेशनकार्डधारकांना ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव कलांद्री येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करावी लागते. पावसाळ्यात येथे चिखल तुडवीत जावे लागते. त्यामुळे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या निरव्हा येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बारव्हा येथील रेशनकार्डधारक महिलांनी अन्नपुरवठा विभागाकडे केली आहे.
उमरेड तालुक्यातील बारव्हा येथे ६० पेक्षा अधिक रेशनकार्डधारक आहेत. या गावातील कार्डधारकांना येथून ४ किलोमीटर अंतरावरील बोरगाव कलांद्री येथे धान्याची उचल करण्यासाठी धडपड करावी लागते. यापूर्वी बारव्हा गावातील २२ कार्डधारकांना निरव्हा येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता उर्वरित कार्डधारकांनासुद्धा निरव्हा येथील स्वस्त धान्य दुकानात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांच्याकडे केली आहे. सीता बोंदरे, शामकला पेंदाम, वैशाली इरपाते, गिरजा पेंदाम, मंदा झिलपे आदींसह काही महिला सदर कार्यालयात आल्या होत्या. याकरिता ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असल्याची बाब बहादूरकर यांनी सांगितली.