निशांत वानखेडे
नागपूर : अहमदाबाद येथील नद्या व तलावांमध्ये काेराेनाचे विषाणू आढळल्याच्या सर्वेक्षणाने देशात खळबळ उडविली आहे. नागपूर शहरातही ही शक्यता नाकारता येत नाही. कारण घराघरातून निघणारे सांडपाणी (सिवेज) हे नद्या व तलावांच्या प्रदूषणाचे सर्वात माेठे कारण आहे आणि दरवर्षीच्या सर्वेक्षणानुसार ‘काॅलिफार्म’ हेच जलप्रदूषणाचे माेठे घटक असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे काेराेना काळात घराघरातून, रुग्णालयांमधून निघणाऱ्या सिवेजद्वारे काेराेनाचे विषाणू नदी, तलावांमध्ये मिसळण्याची शक्यता आहे.
काेराेनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांसह नागपूरही हायरिस्कवर हाेते. दुसऱ्या लाटेदरम्यान दरराेज पाॅझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांचा आकडा ८००० पर्यंत पाेहोचला हाेता. आतापर्यंत ४.६० लाखांच्यावर रुग्णांवर उपचार करण्यात आला. यातील अनेक जण शासकीय व खासगी रुग्णालयात हाेते, तर असंख्य हाेम आयसाेलेशनमध्ये हाेते. त्यामुळे रुग्णांच्या शाैचासह आंघाेळीचे सांडपाणी सिवेजद्वारे नद्या व तलावांमध्ये मिसळलेले आहे, हे निश्चित. त्यामुळे संक्रमितांकडून काेराेनाचे विषाणू नदी, तलावांमध्ये पाेहोचले आहेत, हे नाकारता येत नाही. मात्र सिवेजमधील विषाणू कितपत धाेकादायक आहेत हा संशाेधनाचा विषय आहे.
सांडपाणी आणि प्रदूषणाची स्थिती
शहरातून दरराेज ६५० एमएलडी सांडपाणी घराघरातून व रुग्णालयातून बाहेर निघते. ३३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून काेराडी थर्मल पाॅवर प्लॅन्टला दिले जाते. उरलेले सांडपाणी थेट नाग नदीवाटे कन्हान नदी व पुढे वैनगंगेला जाऊन मिळते, तर काही शहरातील तलावांमध्येही जाते.
- नीरीच्या २०१९-२०च्या तपासणीनुसार यापैकी नाग नदीच्या पाण्यात ४२४ मिलीग्रॅम/लीटर काॅलिफाॅर्म (मानवी शरीरातील मलमूत्राचे घटक)चे प्रमाण आढळले आहेत. पिवळी व पाेहरा नदीमध्ये ते १४१ मिलीग्रॅम/लीटरपर्यंत आढळले. म्हणजे माेठ्या प्रमाणात या नद्या सिवेजमुळे प्रदूषित आहेत.
- नाईक तलावामध्ये अत्याधिक ४८० ते ४९० मिलीग्रॅम/लीटर काॅलिफाॅर्मचे घटक आढळले आहेत. गांधीसागर, अंबाझरी व फटाळा तलावातही काॅलिफाॅर्मचे प्रदूषण आढळले आहे.
- शहरातील काही भागातील भूजल नमुन्यातही काॅलिफाॅर्मचे घटक आढळून आल्याचे निरीक्षण आहे.
नीरीच्या संशाेधकांचा अनाैपचारिक दुजाेरा
नीरीच्या वैज्ञानिकांनी अनाैपचारिकपणे शहरातील तलाव व नद्यांमध्ये काेराेनाचे विषाणू असल्याची शक्यता मान्य केली आहे. एका संशाेधकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, नीरीद्वारे नदी व तलावातील पाण्याचे नियमित माॅनिटरिंग केले जात आहे आणि काहींच्या नमुन्यात विषाणू असल्याचे दिसून येत आहेत. मात्र प्रमाण किती आहे व ते किती धाेकादायक ठरू शकतील, हे सांगता येत नाही.
- काेराेना विषाणूचा हवेतून संसर्ग हाेताे हेच संशाेधन आतापर्यंत सांगितले गेले आहे. पाणी किंवा सांडपाण्यातून संसर्ग हाेत असल्याचे संशाेधन झाले नाही. सध्या तरी महापालिका किंवा इतर काेणत्याही यंत्रणेद्वारे नदी व तलावाच्या पाण्याची विषाणूसंबंधी तपासणी केल्याची माहिती नाही. त्यामुळे यावर निश्चित सांगणे शक्य नसल्याचे ग्रीन व्हिजीलचे काैस्तुभ चटर्जी यांनी स्पष्ट केले.