पाठ्यपुस्तकांच्या किमतीत १५ टक्क्यांची वाढ खिशाला कात्री!
नागपूर :
शाळा सुरू होण्याला तुर्तास वेळ असला, तरी अनेक पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेची तयारी सुरू केली आहे. बाजारात पाठ्यपुस्तकांसह स्कूल बॅग, शूज, टिफीन व वॉटर बॅगसारख्या साहित्याची जोरदार खरेदी सुरू झाली आहे. मात्र यंदा पाठ्यपुस्तकांसह शाळेच्या इतर सर्व साहित्याच्या किमतीत भरमसाट भाववाढ झाली आहे. त्याचा पालकांना जोरदार फटका सहन करावा लागत आहे. मग स्टेट बोर्ड असो, की सीबीएसई, सर्वच अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांसह नोटबुकच्या किमतीत सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय कापड व प्लास्टिकच्या किमतीमध्ये भाववाढ झाल्याने, गणवेशासह स्कूल बॅग, टिफीन व वॉटर बॅगसारख्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. या भाववाढीने आता नर्सरीचे दप्तर सुद्धा हजारोच्या घरात पोहोचले आहे. एका पुस्तक विक्रेत्याच्या मते, गतवर्षी नर्सरीच्या पाठ्यपुस्तकांचे बजेट साधारण ८०० ते १००० रुपयांपर्यंत होते. परंतु यंदा त्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने, पालकांना १००० ते १२०० रुपये मोजावे लागणार आहेत. नोटबुक व पाठ्यपुस्तकांसोबतच पेन, पेन्सिल, रबर, कलर बॉक्स व ड्रॉर्इंग साहित्याच्याही किमतीत भरमसाट वाढ झाल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पालकांची खरेदी सुरू
साधारण स्टेट व सीबीएसई बोर्डाच्या शाळा पुढील २४ जूनपासून सुरू होणार आहेत. परंतु काही पालकांनी आतापासूनच मुलांच्या दप्तरची खरेदी सुरू केली आहे. पाठ्यपुस्तकांसह, गणवेश, स्कूल बॅग व इतर साहित्यांची जोरदार खरेदी केली जात आहे. सीताबर्डी व महाल परिसरातील दुकानांमध्ये पालकांची गर्दी वाढू लागली आहे. पुस्तक विक्रेत्यांच्या मते, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्राहकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. बालभारतीच्या अभ्यासक्रमात बदल बालभारतीने यंदा आपल्या इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या पाठ्यपुस्तकात बदल करण्याची घोषणा केली आहे. परंतु नवीन पुस्तके अजूनपर्यंतही बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे पालकांसह पुस्तके विक्रेत्यांमध्ये या पुस्तकांच्या किमतीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु जाणकारांच्या मते, इतर पुस्तकांच्या किमतीमधील भाववाढ लक्षात घेता, बालभारतीच्या किमतीही वाढण्याची दाट शक्यता आहे.
व्यवसायावर परिणाम नाही पाठ्यपुस्तके, नोटबुक व इतर साहित्याच्या किमतीमधील भाववाढीचा निश्चितच पालकांना फटका बसणार आहे. परंतु पाठ्यपुस्तके ही आवश्यक गरज झाली आहे. यात पालक कोणतीही काटकसर करू शकत नाही. त्यामुळे कितीही भाववाढ झाली तरी पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके व साहित्य खरेदी करावेच लागणार आहे. त्यामुळे या भाववाढीचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही तेवढीच खरेदी-विक्री होईल. नरेश अग्रवाल, पुस्तक विक्रेता ग्राहक महत्त्वाचा गत वर्षभरात कापड व प्लास्टिकच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम गणवेश, स्कूलबॅग, टिफिन व वॉटरबॅगसारख्या साहित्याच्या किमतीवर झाला आहे. कापडाच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे बाजारात मंदी आहे. अशा स्थितीत आम्ही एवढी मोठी भाववाढ करू शकत नाही. आम्ही गत ५० वर्षांपासून ग्राहकांशी जुळलो आहोत. त्यामुळे गणवेश व इतर साहित्यांच्या किमतीत ५ ते ७ टक्क्यांच्या दरवाढीसह विक्री केली जात आहे.
नफा मिळविणे हा मुख्य उद्देश नसून, ग्राहकांचे समाधान महत्त्वाचे आहे.- सत्यप्रकाश अग्रवाल, कापड विक्रेते