नीलेश देशपांडे / मेहा शर्मा
नागपूर : इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडल्याने भीतीचे सावट आहे. शहरातही कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी, दररोज सरासरी ३०० रुग्ण सापडतच आहेत. अशात महापालिका प्रशासनाने शहरातील ९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांच्या बाबतीत शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये संभ्रम आहे. गेल्या शनिवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शाळा संचालकांची बैठक घेऊन कोरोनाबाबतीत शासनाच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून शाळा सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ४० हजारांवर विद्यार्थी शाळेत नियमित यायला लागले आहेत. शाळा सुरू करण्याच्या बाबतीत पालकांच्या काही तक्रारी व सूचनांचा ‘लोकमत’ने अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
- शहरातील शाळा सोमवारपासून सुरू होतील का?
महापालिका प्रशासनाने ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण शाळांना त्यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी शाळांना पालकांचे संमतीपत्र घ्यायचे आहे. त्याचबरोबर पाल्याला शाळेत पाठवायचे की नाही, हेसुद्धा पालकांवर निर्भर आहे. काही शाळांना ५० टक्के पालकांनी प्रतिसाद दिला आहे. काही शाळा टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करणार आहे. पहिला १२ वीचा वर्ग सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर ११ वी, १० वी व ९ वीचे वर्ग सुरू करणार आहे.
- ऑनलाईन क्लासेस सुरू राहतील का?
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे याचे बंधन नाही, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरूच राहील, सोबत शाळाही भरणार आहे.
- पाल्य सुरक्षित राहील का?
प्रशासनाने सर्व शाळा व्यवस्थापनाला कोरोनाची सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छता पाळण्याबरोबर सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, आदी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करायच्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्थाही एका बेंचवर एकच विद्यार्थी राहणार आहे.
- विद्यार्थ्यांसाठी कोरोना टेस्ट बंधनकारक आहे का?
होय, विद्यार्थ्यांचे फिटनेस प्रमाणपत्र शाळांना घ्यायला सांगितले आहे.
- शाळेच्या काळात ब्रेक मिळणार का?
३० मिनिटांचा ब्रेक देण्यात येईल, पण त्यावर नियंत्रण राहील. त्यांनी घरूनच जेवनाचा डबा आणायचा आहे. शौचालयाचाही वापर करताना एका वेळी दोन किंवा तीन विद्यार्थी करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे.
- स्कूल बेसेस सुरू होईल का?
स्कूल बस सुरू होणार नाही, विद्यार्थ्यांना स्वत:च्या वाहनाने शाळेत यायचे आहे.
- शाळा पूर्णवेळ राहील का?
नाही, शाळेची वेळ तीन ते साडेतीन तासाची राहील. शाळेत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ अथवा प्रार्थना होणार नाही.
- ‘युके’मधील नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे योग्य राहील काय?
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, कोरोना महामारी आणखी काही काळ राहणार असल्याने आपल्याला ही परिस्थिती स्वीकारून त्यासोबत सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे. त्यामुळे वरच्या वर्गातील मुलांना शाळेत जावेच लागेल. कारण हे वर्ष त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
- नवीन स्ट्रेन व्हायरस आपल्या शहरात आढळला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे आपणाला शाळा सुरू करण्यास हरकत नाही. मार्गदर्शक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आणि तेही वर्ग ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. आता जवळपास सर्व क्षेत्र सुरळीतपणे सुरू झालेले असल्याने ९ वी ते १२ वी हे महत्त्वाचे वर्ष असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांचे वर्ग सुरू करणे योग्य ठरेल.
- राधाकृष्णन बी. मनपा आयुक्त
महापालिकेच्या हद्दीत ५९३ शाळा असून ९ वी ते १२ वीचे १ लाख ४० हजार विद्यार्थी आहेत. बहुतांशी शाळांनी शाळा सुरू करण्यात संमती दर्शविली आहे. जवळपास ३० शाळांकडून संमती आलेली नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व शाळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आम्ही तयार आहोत. शाळेच्या पहिल्या दिवशी किती विद्यार्थी उपस्थित राहतील, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
- प्रीती मिश्रीकोटकर, शिक्षणाधिकारी, मनपा