आनंद डेकाटे, नागपूर :
समता प्रतिष्ठानच्या पाठोपाठ आता नागपुरातील बार्टीचे विभागीय कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. सध्या हे कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू आहे. एका प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या भरवशावर नागपुरातील विभागीय कार्यालय सुरू असल्याचा केवळ देखावा केला जात आहे. एकूणच नागपुरातील सामाजिक न्याय विभागाचा असलेला दबदबा नामशेष झाला आहे. याचा फटका नागपूर विभाग व एकूणच विदर्भातील मागासवर्गीयांवर होत आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी ही एक स्वायत्त संस्था आहे. साामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या विविध योजना मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यात आणि एकूणच मागासवर्गीयांच्या विकासात बार्टी या संस्थेचे मोठे योगदान राहिले आहे. नागपूर व विदर्भ या पट्ट्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच दूरवरच्या लोकांपर्यंत याचा लाभ व्हावा म्हणून बार्टीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. नागपुरात हे कार्यालय सुरू झाले. त्याचा लाभही मोठ्या प्रमाणात लोकांना भेटू लागला. भाजपच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. याची स्थापना कंपनीच्या धर्तीवर करण्यात आली. नागपुरातच याचे मुख्यालय होते. या समता प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविले गेले. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात कार्यक्रम राबविले गेले; परंतु या कार्यक्रमांवर झालेल्या खर्चात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. चौकशी झाली आणि समता प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी कर्मचारी निलंबित करीत हे कार्यालय एकप्रकारे बंद करण्यात आले. समता प्रतिष्ठान बंद झाल्यानंतर आता येथील बार्टीचे कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. केवळ नावालाच प्रशिक्षणाचे ऑनलाइन कार्यक्रम सुरू आहे.
बॉक्स
१२ पैकी एकही अधिकारी-कर्मचारी नाही
बार्टीच्या विभागीय कार्यालयात एकूण १२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. यासोबतच समता प्रतिष्ठानचे कर्मचारीही बार्टीची कामे सांभाळायचे. सध्या नागपूर जिल्ह्यातील समता दूत प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांच्याकडे विभागाचा अतिरिक्त कारभार साेपवण्यात आला आहे. मुळाच विभागीय कार्यालय बंदच पडले आहे. केवळ दाखविण्यापुरता कारभार पाहिला जात आहे.